केशराचे मोल असणारी पानपिंपरी बुरशीने मातीमोल, काढणीच्या काळात अवकाळी, ढगाळ वातावरण मुळावर
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 20, 2023 19:30 IST2023-12-20T19:30:19+5:302023-12-20T19:30:32+5:30
अमरावती : आयुर्वेदिक गुणांमुळे वेगळेपण असणारी पानपिंपरी नेहमी ४०० रुपये किलो दराने विकली जाते. यंदा मात्र काढणी काळात अवकाळी ...

केशराचे मोल असणारी पानपिंपरी बुरशीने मातीमोल, काढणीच्या काळात अवकाळी, ढगाळ वातावरण मुळावर
अमरावती : आयुर्वेदिक गुणांमुळे वेगळेपण असणारी पानपिंपरी नेहमी ४०० रुपये किलो दराने विकली जाते. यंदा मात्र काढणी काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वातावरणातील आर्द्रता यामुळे पानपिंपरीवर बुरशीचा अटॅक झाला. त्यामुळे उत्पादकांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. ४०० रुपये किलोप्रमाणे मागणी असताना २०० रुपये किलोने विकली जात असल्याचे वास्तव आहे.
कफसायरपसह अन्य आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जात असलेल्या पानपिंपरीचे उत्पादन अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रामुख्याने घेतले जाते. जून महिन्यात याची लागवड केली जाते व एकरभरात साधारणपणे ७ क्विंटलपर्यंत उत्पादन होते. या पिकाचा उत्पादनखर्चदेखील एकरी तीन ते साडेतीन लाखांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चदेखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे, अशी उत्पादकांची मागणी आहे.