अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, आता माघार नाहीच; बच्चू कडूंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:02 IST2025-06-09T13:00:25+5:302025-06-09T13:02:01+5:30
Amravati : मोझरीस्थित राष्ट्रसंतांच्या महासमाधीजवळ अन्नत्याग आंदोलन

Even if the funeral procession starts, there is no turning back now; Bachchu Kadu's determination
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार (अमरावती) : शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. शहरातील बेलोरा चौक येथून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी दुचाकीने या अन्नत्याग आंदोलनाकरिता मोझरीकडे कूच केली.
मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. यात आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल; पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही. मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.
मंत्र्यांना पगार वेळेवर हवा
दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाहीत. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आज राकेश टिकैत येणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकैत ९ जून रोजी गुरुकुंज मोझरी येथे सहभागी होणार आहेत. यात शेकडो प्रहारी तथा शेतकरीही सहभागी झाले आहेत.