अमरावती तालुक्यातील नाव दुर्घटनेतील अकराही मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 18:34 IST2021-09-16T18:34:00+5:302021-09-16T18:34:59+5:30
Amravati News श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशीच सापडले होते, उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत.

अमरावती तालुक्यातील नाव दुर्घटनेतील अकराही मृतदेह सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशीच सापडले होते, उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत. सर्व मृतदेह गवसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते. (Eleven bodies were found in a boat accident in Amravati taluka)
मृतांमध्ये नारायण भोमाजी मटरे (५९), किरण विजय खंडाळे (२८), वंशिका प्रदीप शिवणकर (२), मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (११), अदिती सुखदेव खंडाळे (१३), निशा नारायण मटरे (२२), पीयूष तुळशीदास मटरे (८), अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (१९), अश्विनी अमर खंडाळे (२५), पूनम प्रदीप शिवणकर (२४) यांचा समावेश आहे.
घटनेच्या दिवशी श्याम मनोहर मटरे (२५) व राजकुमार रामदास उईके (४५) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
२२ दिवसात संसार उद्ध्वस्त
मृतांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले होते. अतुल वाघमारे (२५) व वैशाली अतुल वाघमारे (१९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. अवघ्या २२ दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांचे लग्न झाले. संसार सुरळीत सुरू होता. मात्र, १४ सप्टेंबर रोजी या दुर्घटनेत त्यांच्या संसाराचा शेवट झाला. गुरुवारी पहाटेच त्यांचे मृतदेह हाती लागले.
तिसऱ्या दिवशी सापडले आठही मृतदेह
मंगळवारपासून सुरू असलेल्या शोधकार्याला गुरुवारी दुपारी ४ वाजता ब्रेक लागला. बुधवारी दिवसभर शोधकार्य केल्यानंतर निराशेने शोध पथक झोपी गेले. गुरुवारी पहाटे ५.३० पासून शोधकार्याला पुन्हा सुरुवात झाली. यात सर्वप्रथम पियूष तुलसीदास मटरे या बालकाचा मृतदेह घटनास्थळापासून ७ ते ८ किमीवरील हातुर्णानजीक सापडला. पाठोपाठ सहाही मृतदेह हाती लागले. दुपारी ४ वाजता एका मुलीचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
घटनास्थळावरच शवविच्छेदन
मृतदेहांना दुर्गंधी येत असल्याने प्रशासनाने तीर्थक्षेत्र झुंज येथेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष बदनावरे यांनी सात मृतदेहांचे घटनास्थळावर, तर एकाचे रुग्णालयात शवविच्छेदन केले आणि तेथून प्रशासनाने मृतदेह त्यांच्या गावी रुग्णवाहिकेतून पोहचवून दिले. यावेळी नातेवाईकांच्या रुदनाने उपस्थितांना गहिवर दाटून आला होता.