बच्चू कडूंचा अंत पाहू नका, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल : मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:58 IST2025-06-12T12:57:26+5:302025-06-12T12:58:16+5:30
Amravati : मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

Don't watch the end of Bachchu Kadu, the whole of Maharashtra will rise up in flames: Manoj Jarange Patil
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकही फिरणार नाही. शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला.
अन्नत्याग उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला 'लबाडांचे सरकार' संबोधून कडाडून टीका केली. सरकारने बच्चू कडू यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कारण शांत बसलेला वाघ हा चवताळलेल्या वाघापेक्षा खतरनाक असतो. त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला, तर कधी नव्हे असे या महाराष्ट्राचे रौद्ररूप या देशाला पाहावे लागेल. हे जनआंदोलन असून, येथे कुणीही जातपात आडवी आणू नये. कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय, कुण्या जातीसाठी नाही. तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला, तसेच मेंढपाळ संघटना, मच्छीमार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक संघटना, भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
आसेगावात टॉवरवर चढले आंदोलक
अन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता बीएसएनएल टॉवरवर चढून 'शोले स्टाइल' आंदोलन केले. चांदूर बाजार बंद पुकारण्यात आला होता. यात चांदूर बाजार शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंदच ठेवण्यात आली.
"देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीयवादी गिधाडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली; परंतु आता शेतकरी या जातीयवाद्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाहीत."
- रविकांत तुपकर
"अन्नत्याग उपोषणाने आतड्यांना कसे वेढे पडतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. चार दिवस अन्नावाचून राहणे सोपे नाही. त्यासाठी खूप धाडस लागते व असे धाडसी निर्णय बच्चू कडूंसारखा योद्धाच घेऊ शकतो."
- मनोज जरांगे पाटील