सीएसना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:38+5:30
स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण असते. त्यामुळे या विकृताविरुद्ध तेथील महिला स्टाफने आरोग्य यंत्रणेला कळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात आरोग्य सेवेसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना उच्च न्यायालयात दोन वेळा माफी मागावी लागली. अमरावतीमध्ये जगात कुठेही घडला नाही असा अश्लाघ्य व गलिच्छ प्रकार घडला. त्यामुळे सीएसना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण असते. त्यामुळे या विकृताविरुद्ध तेथील महिला स्टाफने आरोग्य यंत्रणेला कळविले. मात्र, ती तोंडी तक्रार होती. याविषयी लेखी तक्रार केली असती, तर हा प्रकार घडलाच नसता, असे त्या म्हणाल्या.
राज्यात काही विकृती फोफावत आहेत. ठिकठिकाणच्या घटना समोर येत असल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत, हे उजागर झाले. त्यामुळे महिलांना उपचार घ्यावेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात एक ‘एसओपी’ विरोधी पक्षनेत्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. त्यावर अंमल झालेला नसल्याचे वाघ यांनी सांगितले.
कोरोनाकाळात क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असावेत, याठिकाणी सीसीटीव्ही असावा, येथील डॉक्टरसह सर्व कर्मचारी महिलाच असाव्यात, या केंद्रांवर तीन ते चार पोलीस कर्मचारी असावे व त्यांच्याजवळ पीपीई कीट असाव्यात आदी मागण्या वाघ यांनी मांडल्या. पत्रपरिषदेला प्रदेश सचिव अर्चना डेहणकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समितीच्या अध्यक्षा राधा कुरील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते.
‘फ्रस्ट्रेट माईंड’मधून पालकमंत्र्याचे वक्तव्य
राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर संवेदनशील महिला आहेत. त्यांनी विरोधकांना आंधळे म्हटल्याने मनस्वी दु:ख झाले. स्थानिकांनी आवाज उठविल्याने ‘फ्रस्ट्रेट माईंड’मधून त्यांनी असे वक्तव्य केले. कोरोनासंबंधी स्वॅब हा नाक, घशातून घेतला जातो; अन्य अवयवातून नाही. यासाठी प्रशासनाने जागृती केली पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. सीएसवर आरोपासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.