बच्चू कडू : राज्यस्तरीय कृषी समृध्दी योजना, कृषी प्रदर्शनीचे उद्घाटनपरतवाडा : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. परंतु मुंबईत दुष्काळ का पडत नाही. इथे जास्त पाऊ स आला तरी मरण आणि नाही आला तरीही मरण. शेतकऱ्यांना अगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, मगच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा. वारकऱ्यांनी वारकरी झेंड्यासोबत शेतकऱ्यांचा झेंडा घेऊन मुंबई गाठली तर सरकारची फजिती होईल, असे मत बच्चू कडू यांनी मांडले. अचलपूर बाजार समितीत आयोजित राज्यस्तरीय कृषी समृध्दी महोत्सव, शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, बाजार समितीचे संचालक मनोहर जाधव, सतीश व्यास, गजानन मोरे, सुधीर रहाटे, तालुका कृषी अधिकारी ए.बी. जाधव शेतकरी समृध्दी संस्थेचे यशवंत पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, २००६ पासून स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या ज्या शिफारशी केल्या त्या लागू केल्यास आत्महत्या थांबतील. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांचे काही एक घेणे, देणे नाही. सातवा वेतन आयोग लागू करताना कर्मचारी महिन्याला तीन हजार रुपयांचे मटन खाणार त्यावर त्याचे वेतन ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात. दुष्काळ शहरात नाही, खेड्यात आहे. तेथे आजही पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधांचा अभाव आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवारामुळे मोठ्या प्रमाणात चांगली कामे झाल्याची पावती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडूंनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)देशातील पहिला प्रयोग अचलपुरातप्रकल्पात सौरपंपाचा उपयोग करुन कोरडवाहू शेतींना पाणी देत ओलिताखाली आणण्याचे कार्य करण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदा अचलपूर मतदारसंघात राबविण्याची तयारी आ. बच्चू कडू यांनी दर्शविली. एका नाल्यातून दुसऱ्या नाल्यात तेथून शेतीला व शेतकऱ्यांचे पाणी सौर पंपाव्दारे देण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी प्रदर्शनीदरम्यान सांगितले. एक तालुका संपलाराज्यात साडेतीन लक्ष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ही आकडेवारी पाहता जवळपास नकाशातून एक तालुका संपला एवढी गंभीर अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याचे कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. अगोदर स्वामिनाथन आयोग लागू करा, मगच सातवा वेतन आयोग द्या, असे ते म्हणाले.बियाण्यांचे सॉफ्टवेअर राज्यात पहिला प्रयोग अचलपुरातशेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक बियाण्यांपासून होते. तेव्हा एक तालुक्याला किती कोणत्या वाणांचे किती बियाणे लागते, ते उत्कृष्ट की निकृष्ट याचे नवीन तंत्रज्ञान सॉफ्टवेअर तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली आहे. त्यामुळे देशातील पहिला प्रयोग अचलपूर मतदारसंघात करण्यात येणार असल्याचे आ. बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केले. जलयुक्त शिवारातून यशस्वी कार्यजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात यशस्वी कामे करण्यात आली आहे. सोलर पंप अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७०० पंपाचे उद्दिष्ट असून केवळ ३० टक्के रक्कम भरून हा पंप शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी ८०० शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ दीडशे शेतकऱ्यांनीच रक्कम भरल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.
मुख्यमंत्री साहेब, मुंबईत दुष्काळ नाही!
By admin | Updated: March 13, 2016 00:14 IST