बच्चू कडू मागण्यांवर ठाम; तिसऱ्या दिवशी मुंडण, जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:03 IST2025-06-11T13:01:52+5:302025-06-11T13:03:10+5:30
Amravati : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू

Bachchu Kadu insists on demands; Shaving, water immersion protest on third day
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा/चांदूर बाजार (अमरावती) : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्यांचीच ओळख मिटविण्याचे मोठे षडयंत्र सरकारकडून रचण्यात येत आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी त्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू आहे.
शेतकरी असंघटित असल्याचा फायदा सरकार घेत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी संकटांना बळी पडून किंवा जीवनात हार मानून मरण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लढाईत जिवाची बाजी लावून संघर्ष करावा. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. उपोषणस्थळी त्यांच्यासह एकूण ५० जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गुरुवारी चक्काजाम
शासनाने ११ जूनपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही, तर नागपूर-अमरावती महामार्गावर शेळ्या-मेंढ्या उभ्या करून चक्काजाम करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे.