राज्यात २४ वर्षांत तब्बल ४९ हजारांवर शेतकरी आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:35 IST2025-03-18T11:34:24+5:302025-03-18T11:35:24+5:30
Amravati : सर्वाधिक २१,१२० शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात

As many as 49,000 farmers committed suicide in the state in 24 years
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात २४ वर्षात तब्बल ४९ हजारांवर शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटांचे बळी ठरल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. यातील सर्वाधिक २१,१२० शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या असून, त्याखालोखाल मराठवाड्यात १२,५१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या ३५ योजना असल्या तरी 'डीबीटी'च्या लॉटरी पद्धतीमुळे गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळेलच, याची खात्री नसल्याने बळीराजाच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे.
पश्चिम विदर्भातील ५, पूर्व विदर्भातील एक आणि मराठवाड्यातील ८ अशा १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत गतवर्षी १,०५१, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात १०४, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९४८ अशा २,१०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील ९८१ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ४१४ अपात्र, तर ७११ प्रकरणे प्रलंबित आहेत.
आत्महत्या प्रकरणात २३ जानेवारी २००६ च्या आदेशानुसार एक लाख रुपयांची मदत देय आहे. ३० हजारांचा चेक तर ७० हजार पोस्ट/बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसाच्या नावे जमा करण्यात येतात. यामध्ये १९ वर्षांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
शेतकरी आत्महत्या अमरावती विभाग
यवतमाळ - ६,२३०
अमरावती - ५४०४
बुलढाणा - ४,४५३
अकोला - ३,१४१
वाशिम - २,०५८
नागपूर विभाग
वर्धा - २,४६४
छत्रपती संभाजीनगर विभाग
बीड - ३,१७०
नांदेड - २,०१२
धाराशिव - १,७३८
छ. संभाजीनगर - १,६८१
परभणी - १,२५१
जालना - १,०७९
लातूर - ९८५
हिंगोली - ५७६