भूकंपानंतर प्रशासनाला जाग ! अमरावतीतील 'सिस्मोग्राफ' यंत्रणा सहा वर्षांपासून बंद; कशी होणार भूकंपाची नोंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:22 IST2025-06-07T15:21:52+5:302025-06-07T15:22:29+5:30
Amravati : नव्या उपकरणाची आवश्यकता नाही; जुने दुरुस्तीची शक्यता नाही

Administration wakes up after earthquake! 'Seismograph' system in Amravati closed for six years; How will earthquakes be recorded?
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भूगर्भातील हालचालीचे नोंद घेणारे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावरील 'सिस्मोग्राफ' (भूकंपमापक) उपकरण सन २०१९ पासून बंद आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी ऊर्ध्व वर्धा विभागाला पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. शिवाय निधी उपलब्धतेची तयारीदेखील दाखविली आहे. तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्षित केल्याचे वास्तव आहे.
धारणी तालुक्यातील शिवझिरीसह या लगतच्या सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू परिसरात ४ जून २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (एनसीएस) स्पष्ट केले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सिस्मोग्रॉफ उफकरणावर नोंद का नाही? याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून बंद अवस्थेतील 'सिस्मोग्रॉफ' उफकरणाचा विषय ऐरणीवर आला.
यापूर्वी मेळघाटात अमझरी व टेटू केंद्रबिंदू असलेल्या गावांसह परिसरातील गावांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १:३७ वाजता ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे सीईओ अनिल भटकर यांनी ऊर्ध्व वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र देऊन सिस्मोग्रॉफ दुरुस्तीचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.
समितीचा अजीब तर्क
ऊर्ध्व वर्धा विभागाद्वारा नव्याने सिस्मोग्राफ उपकरणाचा प्रस्ताव केंद्रीय रचना संस्था, (सीडीओ) नाशिक येथे पाठविला. हे उपकरण खरेदी करण्यासाठी एक समिती असते. यासाठी निधीदेखील भरणा केला. मात्र ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावर नव्याने सिस्मोग्राफ बसविण्याची आवश्यकता नसल्याचे मत या समितीने व्यक्त केल्याची माहिती या विभागाने दिली.
काय आहे 'सिस्मोग्राफ' ?
भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण तरंगांच्या नोंदी घेणारे म्हणजेच भूकंप व तीव्रतेची नोंद घेणारे सिस्मोग्राफ हे यंत्र आहे. यामध्ये सिस्मोमीटर असते. त्याद्वारे भूगर्भातील हालचाली विद्युत संकेतांमध्ये रूपांतरित होतात व हे संकेत डिजिटल किंवा अॅनालॉग पद्धतीने नोंदवले जातात. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू शोधण्यासाठी याचा उपयोग होतो.
भूगर्भात हालचाली, 'जीएसआय'चा अहवाल
- जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमधील काही विशिष्ट भागांत भूगर्भात हालचाली होत असल्याने येथे सौम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवतात, असे निरीक्षण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या केंद्र शासनाच्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.
- दोन शास्त्रज्ञांच्या पथकाने ७ ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान चिखलदरा तालुक्यातील अमझरी व टेटू या भूकंपग्रस्त भागांत मुक्काम करून काही यंत्रांद्वारे निरीक्षणे घेतली होती व याबाबतचा 'जीएसआय'द्वारा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभकटियार यांना दिला होता.
"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."
- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."
- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन