एसटीच्या ४३१ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:50+5:30

राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये या रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. सुदैवाने अद्याप अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

431 rounds of ST canceled | एसटीच्या ४३१ फेऱ्या रद्द

एसटीच्या ४३१ फेऱ्या रद्द

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : साडेपाच लाखांचे उत्पन्नही बुडाले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूमुळे व्यापार-उद्योगासह इतर सर्व क्षेत्रांना फटका बसत आहे. विशेषत: सेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. प्रवाशांनी कोरोनाचा धसका घेतल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. १७ मार्चपासून विभागातील ४३१ फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली. या फेऱ्या रद्द केल्याने ५ लाख ५० हजारांचे उत्पन्नही बुडाले आहे.
राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये या रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. सुदैवाने अद्याप अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव तात्काळ होतो. त्यामुळे भीतीपोटी अनेक जण गर्दीत जाणे व एसटीने प्रवास करण्याचे टाळत आहेत. नागरिक घराबाहेर पडत नसल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अर्थात एसटी बसवर परिणाम जाणवत आहे. त्यातच राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांनादेखील ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर केल्याने एसटी बसच्या प्रवाशांची संख्या आता ३० ते ४० टक्क्क््यांपर्यंत रोडावल्याची माहिती महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसे चित्र बस स्थानकावर प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे. प्रवाशांची गर्दी कमी झाल्याने बस स्थानकावर काहीसा शुकशुकाट आहे.
दरम्यान, अमरावती विभागातून एसटीच्या दररोज २ हजार ४५८ फेऱ्या विविध आगारांतून सुटतात. त्यापैकी ४३१ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. विभागात एकूण आठ आगार आहेत. ४३१ बस फेऱ्या रद्द केल्यामुळे एसटीचा १४ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.


आगार निहाय रद्द फेऱ्या
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातून सुटणाऱ्या १८, बडनेरा १०, परतवाडा ६७, दर्यापूर ३१, चांदूर रेल्वे १३२, वरूड ४२, मोर्शी ८८, चांदूर बाजार ४३ अशा एकूण ४३१ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे सुमारे ५ लाख ५० हजार रुपयाचे महामंडळाचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिक खबरदारी घेत आहे. परिणामी प्रवास करणाऱ्यांची संख्याही घटली. विभागातील ४३१ फेऱ्या तूर्तास रद्द केल्या आहेत. यामुळे साडेपाच लाख रूपयांवर आर्थिक नुकसान महामंडळाचे होत आहे.
- श्रीकांत गभणे
विभागीय नियंत्रक

Web Title: 431 rounds of ST canceled