अकोला : जिल्ह्यातील पातूर, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला व बाश्रीटाकळी तालुक्यातील २८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी २९ ऑक्टोबर रोजी पार पडली. या मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालात अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तारूढ गटांना मतदारांनी हादरा देत, नव्या दमाच्या चेहर्यांना संधी दिली. पातूर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केवळ दोन जुने सदस्य पुन्हा निवडून आले. तेथे १५ जागांवर नवीन चेहर्यांना मतदारांनी निवडून देत संधी दिली. या ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या १७ सदस्यांपैकी १0 सदस्य महिला आहेत, हे विशेष. शिर्ला ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तीन उमेदवार अविरोध निवडून आले होते. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीत मतदारांनी दिग्गजांना नाकारत नव्या सामान्य चेहर्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत बहुतांश उमेदवार स्वतंत्र लढले. मलकापूर ग्रामपंचायतमध्ये मतदारांनी काही नव्या उमेदवारांना संधी दिली. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व हिवरखेड या दोन ग्रामपंचायतींत मतदारांनी अनेक नव्या चेहर्यांना पसंती दिली. बेलखेड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गजानन उंबरकार यांच्या पॅनलला ग्रामपंचायतच्या १५ जागांपैकी केवळ ५ जागांवर विजय मिळाला. तेथे मोहन गोमासे यांच्या सत्ताधारी पॅनलला तब्बल १0 जागांवर विजय मिळाला आहे. हिवरखेड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी जिल्हा परिषद सदस्य जमीलउल्ला व गिर्हे, भोपळे पॅनलला १७ पैकी चार जागा, मुन्ना मीरसाहेब व रमेश दुतोंडे यांच्या गटाला ७ जागा, वसंतराव ओंकारे गटाला ३, तर सुनील इंगळे, मिलिंद भोपळे यांच्या गटाला दोन जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत एकाही पॅनलला बहुमत मिळाले नाही. अशाच प्रकारे बाळापूर, मूर्तिजापूर व अकोला, बाश्रीटाकळी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ गटाचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत.
*निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, बेलखेड, मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु., हातगाव व चिखली, अकोला तालुक्यातील डोंगरगाव, बाळापूर तालुक्यातील खिरपुरी खुर्द व मांडोली, बाश्रीटाकळी तालुक्यातील सुकळी आणि पातूर तालुक्यातील आलेगाव, सस्ती, मलकापूर व शिर्ला इत्यादी १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी पार पडली. व निकाल घोषित करण्यात आले.