अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, नगर शहरासाठी तातडीने रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या वतीने शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु, गंभीर रुग्णांच्या संख्या वाढले आहेत. या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे आहे, वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, मागणीच्या प्रमाणात नगर शहरासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांवर उपचार करणे कठीण होत असून, नगर शहरासाठी हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी वाकळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
....