नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:54 PM2019-11-16T13:54:21+5:302019-11-16T13:54:27+5:30

नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Nagar-Solapur state highway became a deathbed | नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

googlenewsNext

विनायक चव्हाण । 
मिरजगाव : नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रित मुरुम टाकल्याने काही ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरात दुसºयांदा खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होत असून अनेक अपघातही होत आहेत.
खड्ड्यांमध्ये टाकलेली माती, वाहनांची संख्या अधिक असल्याने आठवडाभरही राहत नाही. मातीमुळे मार्गावर प्रचंड धुळीचे लोट उठतात. यामुळे अनेकदा समोरील वाहनही दिसत नाही. हा रस्ता मिरजगाव, माहिजळगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी येथे लोकवस्तीतून जातो. त्यामुळे येथील व्यावसायिक, रहिवासी, पादचारी यांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.
हा रस्ता निमगाव डाकूपर्यंत पूर्णत: खराब झाला आहे. तातडीने या मार्गावर पूर्णपणे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे. मिरजगावपासून ते नगरपर्यंत यामार्गावर पावसाने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. जोतिबावाडी, कठिणदेव, आंबिलवाडी, शिराढोण या परिसरात साईडपट्ट्या दोन फुटाहून खोल गेल्या आहेत. काही ठिकाणी डांबरीकरणाचे अस्तरच शिल्लक राहिलेले नाही. मिरजगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी, शिराढोण, माहिजळगाव, रेल्वे क्रॉसिंग येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 
महामार्ग प्राधिकरणाकडे हा राज्यमार्ग हस्तांतरित होणार आहे हे कारण पुढे करून गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग हा मार्ग दुरूस्त करण्यास टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायतीने मिरजगावमधील बावडकरपट्टी ते उकरी नदीपर्यंचा रस्ता तातडीने दुरूस्त करण्यासंदर्भात पत्र दिले. येत्या आठ ते दिवसात हा रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे यांनी सांगितले. 
मिरजगावसह जास्त अंतर असलेला खराब रस्ता दुरूस्त होण्यासाठी दहा दिवसाचा अवधी लागेल. आठ दिवसात नगर ते माहिजळगावपर्यंतचे खड्डे बुजवून होतील, असे अहमदनगर जागतिक बँक प्रकल्पाचे शाखा अभियंता रामराव वाघ यांनी सांगितले. 
 

Web Title: Nagar-Solapur state highway became a deathbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.