महाघाईत भर.. खतांचे दरही शंभर रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:20+5:302021-03-09T04:24:20+5:30
अहमदनगर : इंधन दरवाढीने शेती मशागतीचे भाव कमालीचे वाढलेले असतानाच आता रासायनिक खतांचेही दर (पन्नास किलोची बॅग) शंभर रुपयांनी ...
अहमदनगर : इंधन दरवाढीने शेती मशागतीचे भाव कमालीचे वाढलेले असतानाच आता रासायनिक खतांचेही दर (पन्नास किलोची बॅग) शंभर रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे महाघाईत भर पडून शेतकरी हतबल झाले आहेत.
गेल्या तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने कमालीची इंधन दरवाढ झाली. त्यातही डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला. डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागतीचा खर्चही कमालीचा वाढला आहे. नांगरणी, काकऱ्या पाळी, पेरणी, रोटाव्हेटर, हार्वेस्टरने पीक मळणी या सर्वांचाच खर्च वाढला आहे. यामध्ये एकरी दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे.
यातच आता गेल्या काही दिवसांत खतांचे दरही वाढले आहेत. प्रत्येक खताच्या एका पन्नास किलोच्या गोणीमागे जवळपास शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांत शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतील. त्यासाठी अगोदरच खते, बियाणे घेतली जातात. त्यात त्यांना आता अधिकचे पैसे मोजावे लागतील. एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून खतांच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती एका कृषी सेवा केंद्र चालकाने दिली.
---
मशागतही महागली (एकरी दर ट्रॅक्टर)
मशागत प्रकार आधीचे दर आताचे दर
नांगरणी २००० २४००
काकऱ्या पाळी ७०० ९००
सारे (वाफे) ८०० १०००
रोटाव्हेटर १७०० २०००
पेरणी ८०० १२००
--------------
डीएसपीचे दर (५० किलो) आधीचे दर आताचे दर
१०-२६-२६ १२३० १३३०
१९-१९-१९ १२०० १३००
२४-२४-२४ १२२० १३५०
-------------
कोरोनामुळे गेले वर्षभर कांदा वगळता इतर कोणत्याच पिकाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक नियोजन कोलमडले आहे. इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च वाढलेला असतानाच आता खतांच्या किमतीतही वाढ झाली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेन परतावा नगण्य आहे.
रोहिदास शिंदे,
शेतकरी, अरणगाव
------
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून आम्ही ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या मशागती करून देतो. त्यासाठी डिझेलच्या भावानुसारच पैसे आकारतो. मात्र, गेल्या काही दिवसांत वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे आम्हाला मशागतीचे पैसे वाढवावे लागले आहेत. शेतकरी इतके पैसे कसे वाढले असे विचारतात. मात्र, आमचाही नाइलाज आहे. आम्हालाही हा व्यवसाय परवडत नाही.
-मच्छिंद्र शिंदे,
ट्रॅक्टर चालक, श्रीगोंदा
----