थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:54+5:302021-01-18T04:19:54+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील गौण खनिजच्या ४५६ प्रकरणात ५० कोटी रुपयांची वसुली तातडीने करावी. रक्कम वसूल होत नसेल तर थकबाकीदारांच्या ...
अहमदनगर : जिल्ह्यातील गौण खनिजच्या ४५६ प्रकरणात ५० कोटी रुपयांची वसुली तातडीने करावी. रक्कम वसूल होत नसेल तर थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करून ही रक्कम वसूल करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गौण खनिज विभागाला दिला.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तहसील स्तरावरील गौण खनिज थकबाकीदारांची झालेली वसुली व शिल्लक वसुली याबाबतचा आढावा घेण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस विशेष शिबिराचे नगर येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. गौण खनिज प्रकरणात जिल्ह्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच कारवाई झालेली आहे. यादरम्यान पंचनामे झालेले, वाळूची अवैध वाहतूक करताना आढळलेले, अवैध वाळूसाठे जप्त केले आहेत. अशा कारवाईत पंचनामे झालेले असून, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. वाळूची वाहतूक करताना वाहने आढळली, मात्र ती परजिल्ह्यांतील होती. जिल्ह्यात महसूल पथकाना अनधिकृत गौण खजिनचे साठे आढळून आले. यामध्येही काही प्रकरणे आहेत. त्यामध्ये प्राथमिक कारवाई झालेली ४५६ प्रकरणे आहेत. या प्रकरणाची वसूल करायची रक्कम ही ५० कोटींच्या पुढे असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये काही प्रकरणात जमिनीवर बोजा चढविण्यात आला आहे. काही प्रकरणांत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये जप्त मालमत्तेचे लिलाव करून सदरची रक्कम वसूल करावी, असे आदेश जिल्हाधिकारी भोसले यांनी या शिबिरात दिले.
यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी वासिम सय्यद, आशुतोष खेडकर यांच्यासह गौण खनिज विभाग आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.