श्रीगोंदा (अहमदनगर) : घोड धरणाचे २९ पैकी २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून नदीपात्रात सुमारे २३ हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे. यामुळे घोड नदीला पूर आला आहे. पुरामुळे नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
घोड धरणाची पाणी साठवण क्षमता ७ हजार ६३९ दशलक्ष घनफूट आहे. उपयुक्त पाणीसाठा ५हजार ४६७ दशलक्ष घनफुट असून मृत साठा २ हजार १७२ दशलक्ष घनफूट एवढा आहे. गेल्या चोवीस तासापासून घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. तसेच डिंभे धरणातून सुमारे दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी आणि इतर ओढे, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने घोड धरणातून सुमारे २३ हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काष्टी आणि नदीच्या काठावरच्या वाड्या वस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.हे पाणी सोडण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे तीन फुटापर्यंत तर चौदा दरवाजे दोन फुटापर्यंत असे तब्बल वीस दरवाजा खुले करण्यात आले आहेत. त्यामधून २२ हजार ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सांडव्यामध्ये सोडण्यात येत आहे.
दरम्यान धरणाची सुरक्षा ठेवण्यासाठी विभागाचे स्थापत्य सहाय्यक जी.डी. भापकर, बाळासाहेब जगताप यांच्यासह १५ कर्मचारी धरणक्षेत्रावर तैनात आहेत. याशिवाय अभियंता किरण तरटे, उपअभियंता जे.व्ही.बरड वेळावेळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेत आहेत.