श्रीरामपूर : आहाराच्या बदललेल्या सवयींमुळे पोटातील अल्सरच्या रुग्णांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. कृत्रिम तिखट व आंबट पदार्थ जास्त खाण्यात गेल्यामुळे पोटाचे विकार लोकांना जडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला लोकांची अधिक पसंती मिळत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. मात्र अतिप्रमाणात तिखट खाणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारात तिखट पदार्थांचा समावेश अधिक असलेल्या लोकांना अल्सरचा त्रास उद्भवल्याचे अनेक प्रकार त्यामुळे समोर येत आहेत.
---------
काय आहेत लक्षणे
पोट दुखणे
मळमळ होणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
काळे शौच होणे
वजन कमी होणे
ॲसिडिटी वाढणे
----------
काय काळजी घेणार
अल्सरचा त्रास उदभवू नये तसेच त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काळे मनुके खाणे, डाळिंबाचा आहारात समावेश करणे तसेच गावरान तूप व राजगिरा खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यातून अल्सरचा प्रभाव कमी करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
---------
पूर्वी तिखट खायचे झाल्यास केवळ मिरची खालली जात होती. मात्र ती नैसर्गिक होती. आता कृत्रिम व केमिकलयुक्त तसेच ॲसिडिक पदार्थ जास्त वापरले जात आहेत. त्यामुळे अल्सर होण्याचा धोका अधिक आहे.
-----------
खाण्याच्या सवयींबरोबरच मानसिक ताणतणाव हा पोटाच्या विकार जडण्यामागील एक कारण आहे. पुरेशी झोप हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
डॉ. महेश क्षीरसागर, श्रीरामपूर.
--------------
तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट असे सर्वच रस शरीरात योग्य प्रमाणात गेले पाहिजे. त्याचबरोबर लोक चटणी किंवा लोणचे यांचा तोंडी लावण्यासाठी जेवणात उपयोग करतात. मात्र त्याऐवजी मोरावळा, गुलकंद यांचा वापर करावा.
डॉ. स्वप्नील नवले, श्रीरामपूर.
----------