अहमदनगर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह गर्दी करण्यावर, जमाव करण्यास पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. हे निर्बंध २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि लॉकडाऊन राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भोसले यांनी शनिवारी एका आदेशाद्वारे या नियमांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे, रात्री १० ते पहाटे पाच या वेळेत फिरणे, विवाह समारंभ, अंत्यविधी यासाठी गर्दी करणे यावर पूर्वीप्रमाणेच निर्बंध असणार आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी राहील. याशिवाय मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, एकत्र जमणे, सावर्जनिक ठिकाणी थुंकणे यावर बंदी कायम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी निर्जुंतुकीकरण करणे, औष्णिक परीक्षण करण्याबाबत अनिवार्य राहील. या आदेशामुळे कोरोनाच्या नियम आणखी महिनाभर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.