उंबरी बाळापूर ते शेडगाव या गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाच्या कामाचे तसेच मतमाऊली तीर्थस्थानावरील सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्या दीपाली डेंगळे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, कैलास तांबे, डॉ.दिनकर गायकवाड, भगवानराव इलग, सरुनाथ उंबरकर, जहुरभाई शेख, कांचनताई मांढरे, नारायणराव कहार, सरपंच संदीप घुगे, सरपंच अरुण भुसाळ, सचिन शिंदे उपस्थित होते.
विखे म्हणाले, या परिसरातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदारसंघात झाल्यानंतर अनेकांनी आमच्याबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु कोणाच्याही लिप्ट बंद झाल्या नाहीत, उसाचे क्षेत्रही कमी झाले नाही, उलट या भागातील रस्त्यांची अवस्था २५ वर्षांपूर्वी कशी होती हे सर्वांना माहिती आहे. आता वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते झाले, दळणवळणाची सुविधा निर्माण झाली. रस्ते विकासाचे जाळे निर्माण झाले. याभागात पाच मोठे पूल बांधण्यात सर्वांच्या सहकार्याने यश आले. आता हा सहावा मोठा पूल मार्गी लागत आहे याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवरा नदीवरील पाच मोठ्या पुलांचे काम पूर्ण होऊन या मार्गावरून वाहतूकही सुरळीत सुरू झाली. प्रवरा नदीवरील सहाव्या क्रमांकाचा हा पूल पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या पुलाच्या कामामुळे उंबरी बाळापूर ते शेडगाव या दोन गावांसह अंभोरे, मालूंजे, पानोडी, शिबलापूर माळेवाडी, पिंपरणे, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रूक या गावांनाही या मोठ्या पुलाचा लाभ होणार आहे.