अहमदनगर : एकीकडे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या आवारात एका शिक्षिकेचा गटशिक्षणाधिकारी यांनी विनयभंग केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील एका शाळेचा विद्यार्थी पट कमी झाल्याने ती शाळा बंद पडली होती. त्यामुळे या शाळेवरील शिक्षिका अन्य शाळेमध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी एक सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेतील गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कार्यालयात खेटे मारत होत्या. बुधवारी त्या जिल्हा परिषदेत आल्या होत्या. यावेळी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘तू किती दिवस चकरा मारतेस, तुझे काम व्हायचे असेल तर माझ्यासोबत चल’, असे म्हणून सदर शिक्षिकेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकरणी सदर शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून धनवे याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीईओंकडून दखलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. यापूर्वीही गटशिक्षणाधिकारी धनवे यांच्याविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळेच नवाल यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. धनवेंवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा
By admin | Updated: January 30, 2023 12:36 IST