बाभळेश्वर : निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहार हा गरजेचा आहे. नक्षत्र परसबाग ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात किमान शंभर परसबागा उभ्या राहण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. यासाठी जनसेवा फाउंडेशन आपल्याला सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले.
बाभळेश्वर (ता.राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात पंचायत समिती राहाता आणि जनसेवा फाउंडेशन यांच्यावतीने नक्षत्र पोषण परसबाग सुरु करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे, उपसभापती उमेश जपे, माजी उपसभापती बबलू म्हस्के, पंचायत समितीचे सदस्य संतोष ब्राह्मणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे, गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख अनुराधा वांढेकर, पंचायत समितीचे प्रमोद पांडे, बाभळेश्वरच्या उपसरपंच अमृत मोकाशी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत ही नक्षत्र परसबाग आहे. गावपातळीवर विषमुक्त भाजीपाला ही संकल्पना राबवून सेंद्रिय परस बागेला प्रोत्साहन द्यावे. बचतगटाद्वारे ही संकल्पना राबविताना प्रत्येक गावात परसबागेचे निर्मिती करावी, असे आवाहन विखे यांनी केले. प्रारंभी पंचायत समितीचे परसबागेचे समन्वक प्रमोद पांडे यांनी उपक्रमाची माहिती दिली. बाभळेश्वरचे उपसरपंच अमृत मोकाशे यांनी आभार मानले.