Maharashtra Election 2019: केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांवर ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:38 IST2019-10-18T04:37:41+5:302019-10-18T06:38:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले.

Maharashtra Election 2019: केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांवर ईडीची कारवाई
- अतुल कुलकर्णी
संगमनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. राज्यातीेल जनतेला हे बिलकूल आवडलेले नाही, असे मत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत केलेल्या विधानाकडे तुम्ही कसे पाहता?
राजकारणात असताना मनात जे येते ते बोललेच पाहिजे असे नाही. सुशीलकुमार यांनी असे बोलण्याची गरज नव्हती.
आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक जण कॉँग्रेस सोडून गेले असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल?
मी प्रदेशाध्यक्ष नसताना विखे पाटील कॉँग्रेस सोडून गेले याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल. पक्ष सोडून जाण्याची सुरवात त्यांनी केली आहे. त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्या तोंडी शोभत नाहीत.
विखे यांच्या मुलालातुम्ही खासदारकीचे तिकीट देऊ शकला नाहीत म्हणून ते सोडून गेले...?
विखे पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. मात्र, आपण कोणासोबत जात आहोत त्यांची विचारसरणी काय, आपली काय याचा सारासार विचारही त्यांनी केला नाही. पक्ष सोडून जाण्याची लाट काही मोजक्या नेत्यांमध्ये असली तरी सर्वसामान्यांना ते आवडलेले नाही. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणारे उंदरांसारखे असतात असे विधान केले होते. या विधानानंतर भाजपमध्ये गेलेल्या अन्य पक्षातील नेत्यांची काय अवस्था असेल हे त्यांनी समजून घ्यावे.
तुम्हाला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिले पण ते संगमनेरमध्येच पडून आहे. विखे म्हणतात तसे तुम्हाला मतदारसंघ सोडणे अशक्य झाले आहे?
त्यांची माहिती अर्धवट आहे. मी राज्यभर फिरत आहे. विखे विरोधीपक्षनेते असताना त्यांना राज्यभर फिरण्याची संधी होती. मात्र, ते भाजपत गेले मंत्री झाले, उलट त्यांना आता जिल्ह्यातल्या तीनच मतदारसंघात मागणी आहे. ते कॉँग्रेसमध्ये राहिले असते तर राज्यभर फिरू शकले असते. वाईट परिस्थिती त्यांनी स्वत:ची करून घेतली आहे.
पक्षातल्या आउटगोर्इंगमुळे कॉँग्रेसला नुकसान होईल का?
असे बिलकुल नाही. ज्या ज्या वेळी कॉँग्रेस संपली असे बोलले गेले त्या त्या वेळी कॉँग्रेस नव्याने जिवंत झाली आहे. या आधी इंदिरा गांधी यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांच्या पर्यंतचा इतिहास साक्षी आहे. उलट अनेक वर्ष ज्यांनी मतदारसंघ आडवून ठेवले होते. ते निघून गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल. त्या जागी नव्या चेहऱ्यांना आम्हाला संधी देता आली याचा चांगला परिणाम निकालात पहावयास मिळेल.
तुम्ही भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत?
भाजपचे नेते दुष्काळी भागात जावून पावसावर असे भाषण करतील की लोकांना जणू पाऊसच आल्यासारखे वाटेल! चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबर २०१५ पर्यंत सगळे रस्ते खड्डेमुक्त होतील, असे विधान केले होते. माझे त्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की महाराष्टÑातल्या रस्त्यांवरून फिरून दाखवावे, यवतमाळ-नांदेड, मुंबई-गोवा किंवा जळगाव- औरंगाबाद यापैकी कुठल्याही एका रस्त्यावरून त्यांनी प्रवास करावा. आम्ही त्यांचा सत्कार करू. ग्रामीण भागात एकही रस्ता विनाखड्याचा उरलेला नाही. याच रस्त्यांवरून मतदार मतदानाला जातील आणि सत्ताधाऱ्यांचा निकाल लावतील. नितीन गडकरी यांनी सुरूवातीच्या काळात चांगले काम करतो असे दाखविले. मात्र, त्यांनाही बंधने आणल्याची माहिती आहे.
तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून कमी कालावधी मिळाला असे तुम्ही सांगता. जो वेळ मिळाला. त्यात तुम्ही काय करू शकलात?
आम्ही यावेळी अनेक तरूण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र मुंबई, कोकण या विभागांच्या जबाबदाºया वाटून दिल्या आहेत. तरूणांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून वेगळे वातावरण तयार करण्यात आम्हाला यश आले आहे. याचा परिणाम निकालात दिसेलच.
काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे भूमाफियांशी संबंध असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप तुम्हाला अडचणीचा ठरेल का?
इतके दिवस भाजप नेते ३७० क लम रद्द केले म्हणून राज्यभर प्रचार करत होते. मात्र, या प्रचाराचा फायदा होण्या ऐवजी नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आता कॉँग्रेस, राष्टÑवादीवर बेछुट आरोप करणे सुरू केले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, दिपक सावंत या आजी-माजी मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाची उत्तरे महाराष्ट्रतल्या जनतेला दिली तर बरे होईल. आपले ठेवायचे झाकून दुसºयांचे पहायचे वाकून ही वृत्ती भाजपने आता सोडून द्यावी.