'चाकणकर' खात्यातून २.४० कोटींची उलाढाल, चार्जशीटमधून नाव वगळले; खरातच्या अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:37 IST2026-04-10T14:37:20+5:302026-04-10T14:37:20+5:30
साई संस्थान कर्मचाऱ्याची आत्महत्या प्रकरणाचा होणार फेरतपास

'चाकणकर' खात्यातून २.४० कोटींची उलाढाल, चार्जशीटमधून नाव वगळले; खरातच्या अडचणी वाढणार
Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती पोलिसांनी तपासाचा पाश घट्ट केला असून, समता पतसंस्थेत संशयास्पद असलेल्या चाकणकर नावाच्या खात्यांमधून तब्बल २ कोटी ४० लाखांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, संस्थान कर्मचारी विकास दिवटे आत्महत्या प्रकरणी खरातचे नाव दोषारोपपत्रातून पोलिसांनी वगळल्याने या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, असा अर्ज दिवटे यांच्या भावाने न्यायालयात दिला असून लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
समता पतसंस्थेमध्ये अनेक व्यक्तींच्या नावाने बोगस खाती उघडण्यात आली असून, या सर्व खात्यांवर वारस म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. यामध्ये विशेषतः 'चाकणकर' आडनाव असलेल्या चार खात्यांमधून आतापर्यंत २ कोटी ४० लाख रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे, इतकी मोठी उलाढाल झालेली असताना सध्या या खात्यांमध्ये केवळ नाममात्र रक्कम शिल्लक आहे. या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, असाच प्रकार सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही घडल्याचे समोर आल्याने याचा तपास नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्यावेळी वगळले खरातचे नाव
साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दिवटे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अशोक खरात याच्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताना 'पुराव्यांचा अभाव' असल्याचे कारण देत खरातचे नाव वगळले होते. खरातचे नाव का वगळले, असा सवाल उपस्थित करत दिवटे यांच्या भावाने राहाता न्यायालयात फेरतपासासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेतला आहे, आता या प्रकरणाची नव्याने सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.
अशोक खरातच्या पत्नीचा अर्ज
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही शिर्डीत जमीन व्यवहार आणि बेकायदेशीर खासगी सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अटकेच्या भीतीने तिने राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मात्र, पोलिसांनी तिला जामीन मिळू नये, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला आहे.