बायोमेट्रिक पद्धतीमुळे ‘कोरोना’च्या प्रसाराची भीती; ठसे, बायोमेट्रिक हजेरी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:05 IST2020-03-08T16:04:38+5:302020-03-08T16:05:24+5:30
साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़.

बायोमेट्रिक पद्धतीमुळे ‘कोरोना’च्या प्रसाराची भीती; ठसे, बायोमेट्रिक हजेरी धोकादायक
प्रमोद आहेर ।
शिर्डी : साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार स्वच्छ करणे, हस्तांदोलन टाळणे आदी सूचना देण्यात येत आहेत. संस्थानमध्ये सामान्य भाविकांना बायोमेट्रिक दर्शनाचा पास काढावा लागतो. यासाठी आठ-दहा मशीन बसवण्यात आले आहेत. इथे प्रत्येक भाविकाचा फोटो काढण्यात येतो व हाताचा ठसा घेण्यात येतो. रांगेत असलेले भाविक एका पाठोपाठ एक त्या मशिनवर थमसाठी आपली बोटे टेकवतात. यात एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीने थम मशिनवर ठसे दिल्यानंतर त्या पाठोपाठ थम देणा-या भाविकालाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिर्डीत रोज सरासरी पन्नास हजार तर गर्दीत लाखावर लोक दर्शनासाठी येतात.
एकीकडे संस्थान आयसोलेशन वार्ड तयार करत आहे. आजाराविषयी प्रबोधनाचे फलक लावत आहे. कर्मचारी-अधिका-यांचे प्रशिक्षण घेत आहेत. पण जेथून संसर्गाची शक्यता आहे, अशा गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जेथे भाविक एकाच जागेवर वारंवार हात लावतात, अशा ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़. या अगोदरच ही बायोमेट्रिक पद्धत भाविकांसाठी त्रासदायक व अनावश्यक ठरत आहे. आता ती जीवघेणीही ठरण्याची शक्यता झाल्याने संस्थानने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायतसह शहरातील अनेक हॉटेल, संस्था, आस्थापना व काही शाळेतही बायोमेट्रिक हजेरी सुरू आहे़. तुर्तास या ठिकाणीही पुन्हा मस्टरवर हजेरी घेण्याची आवश्यकता आहे़.
आम्ही स्वच्छता वाढवलीय. प्रबोधन करत आहोत. बायोमेट्रिक सिस्टीम जवळ भाविकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देऊ. आणखी काय काय करता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत़, असे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.