बाळूमामांच्या पालखीला विरोध नाही, अंधश्रद्धा थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:22+5:302021-02-11T04:23:22+5:30
श्रीगोंदा : बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक त्यागी संत होऊन गेले आहेत. त्यांच्या नावाने पालखी काढणे याला विरोध नाही. ...

बाळूमामांच्या पालखीला विरोध नाही, अंधश्रद्धा थांबवा
श्रीगोंदा : बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक त्यागी संत होऊन गेले आहेत. त्यांच्या नावाने पालखी काढणे याला विरोध नाही. मात्र मेंढरं शेतकऱ्यांच्या पिकात घालणे यासह इतर अंधश्रद्धांना खतपाणी घालणे बरोबर नाही. असे प्रकार पालखी चालकांनी बंद करण्याची गरज आहे, असे मत करमाळा येथील बाळूमामांचे निस्सीम सेवेकरी मनोहरमामा भोसले महाराज यांनी व्यक्त केले आहे.
‘लोकमत’ने ‘बाळूमामांची मेंढरं तुपाशी आणि भक्ताची मेंढरं उपाशी’ अशा मथळ्याखालील वृत्तातून येथील पालखी सोहळ्यावेळी होणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकला होता. याबाबतच्या वृत्ताचे अनेकांनी स्वागत केले.
याबाबत भोसले महाराज म्हणाले, पालखीच्या पुढे डीजे लावून भंडाऱ्याची उधळण करणे, मातीवरून पाणी दाखविणे, दान करा दुप्पट उत्पन्न मिळेल, लग्नासाठी मुलामुलींनी पंक्तीत जेवण वाढणे, ताईत देऊन वाद मिटविणे आदीबाबी या विज्ञानवादी युगात मान्य होत नाहीत. आता समाज शहाणा झाला आहे. संतांनी समाजातील अनिष्ट चाली, रूढी, अंधश्रद्धा बंद करण्यासाठी जीवन वेचले. यासाठी नरेंद्र दाभोलकर यांचे तर प्राण गेले. बाळूमामा हे संत होते. त्यांनी कधीच अंधश्रद्धा कधीच मान्य केली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरविणे हे विचारवंत समाजाला कधीच मान्य नाही. त्यामुळे पालखीतील कारभाऱ्यांनी आपली भूमिका बदलावी. चांगल्या भावनेने बाळूमामांचा विचार समाजात रूजविण्याचे काम करणे आवश्यक आहे, असेही आवाहन भोसले महाराजांनी केले.