लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. तापाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे डेंग्यूचे आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव होत असताना प्रशासन मात्र थंड आहे. कोणत्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे चांगलेच संतापले. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्हा रुग्णालयात डेंग्यूची चाचणी सुरू करून डेंग्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहे.
कोरोनासोबतच पावसाळी साथीचे आजार वाढत आहेत. सध्या अधूनमधून पाऊस सुरू असल्याने डासांचे प्रमाणही वाढलेले आहे. शहर व जिल्ह्यातील दाट लोकवस्ती, झोपडपट्टी तसेच सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. तापाचे रुग्ण वाढत असून त्यात निम्मे रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणूनच आढळून आलेले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह आरोग्य व महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये डेंग्यूवर उपचार करणे, डेंग्यू रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे आढळून आल्याने विभागीय आयुक्त गमे यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गमे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. डेंग्यूच्या चाचण्याही होत नाहीत. प्रशासन गंभीर नसल्याने रुग्ण वाढत असल्याने गमे यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला.
---
जिल्ह्यात डेंग्यूचे ६२ रुग्ण
अहमदनगर शहरात गत ऑगस्ट महिन्यात १७ तर सप्टेंबर महिन्यात १६ असे एकूण ३३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी ९१ जणांचे नमुने तपासण्यात आले होते. ग्रामीण भागात ऑगस्टमध्ये २३, तर सप्टेंबरमध्ये ६ रुग्ण ्से एकूण २९ रुग्ण आढळल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चिकुमगुनिया आणि हिवतापाचे रुग्ण मात्र या दोन महिन्यात आढळून आले नाहीत. नगर शहरातही प्रत्यक्षात डेंग्युच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीला उपचार घेणाऱ्यांच्या संख्येवरून हे दिसून येते आहे.
------------
डेंग्यूच्या चाचण्या करण्याचा आदेश
डेंग्यूच्या संशयितांची संख्या जास्त आहे. मात्र, त्यांच्या चाचण्या होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा संशयित रुग्णांची डेंग्यू चाचणी करण्याचा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उपचार करावेत. डेंग्यू रोखण्यासाठी फवारणीसह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचनाही यंत्रणेला दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होतात, मात्र ‘एलायझर’ ही चाचणी केली जात नाही. त्यामुळे ही चाचणी जिल्हा रुग्णालयात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
--------------
डेंग्यूची लक्षणे : अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे, त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणे जवळजवळ एक आठवडा टिकतात. परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकतो.
चिकुनगुनिया लक्षणे : चिकनगुनिया तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, अति थकवा येतो. डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजते.
---
हिवताप, मलेरिया लक्षणे : सामान्यत: हिवताप आजारात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था या तीन अवस्था असतात. थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.