उमेदवारीचे ‘घट’ बसले!
By Admin | Updated: September 26, 2014 00:17 IST2014-09-26T00:09:45+5:302014-09-26T00:17:21+5:30
अहमदनगर : उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेसने अनपेक्षितपणे आघाडी घेतली.

उमेदवारीचे ‘घट’ बसले!
अहमदनगर : उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेसने अनपेक्षितपणे आघाडी घेतली. नगर शहरातून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव अपेक्षेप्रमाणे पहिल्याच यादीत आले तर श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. दरम्यान, सेनेने श्रीरामपूरमधून उमेदवारी निश्चित केल्याचा दावा लहू कानडे यांनी केला आहे मनसेने ४ मतदारसंघात उमेदवार उतरविले आहेत. दरम्यान, उमेदवारीच्या घोषणांनी वेग घेतला.
काँग्रेसची पहिली यादी बुधवारी उशिरा रात्री दिल्लीतून जाहीर झाली. त्यासोबतच जिल्ह्याचे राजकारण सचेत झाले. अपेक्षेप्रमाणे मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरसाठी तर राधाकृष्ण विखे यांचे शिर्डी मतदारसंघातून नाव निश्चित झाले. मात्र पहिल्याच यादीत नगर शहरातून सत्यजित तांबे यांचे नाव आल्याने चर्चा झाली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नगर शहरात याच विषयावर राजकारण ढवळून निघाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नगरचे राजकारण ढवळून निघाले आहे. गेल्या काही महिन्यापासून तळ ठोकून असलेले तांबे थेट उमेदवारीबाबत दावा ठोकत नसल्याने मध्यंतरी संभ्रम निर्माण झाला होता. नगर शहरात काँग्रेसच्या जनसमर्थनाला गेल्या काही वर्षात उतरती कळा लागली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत तांबे विधानसभेच्या तयारीला लागल्याने विविध चर्चाही फुटल्या होत्या. त्यातच पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोधाचा सूर लावला होता. या अडचणी पार करत तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर संग्राम जगताप मैदानात आहेत. त्यामुळे सेनेचे विद्यमान आ. अनिल राठोड यांना नव्या पिढीच्या तरुण नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. मनसेने शहरातून वसंत लोढा यांना उमेदवारी जाहीर केल्याने लढत पंचरंगी होणार आहे.
श्रीरामपूरमधून आ. कांबळेंना काँग्रेसची उमेदवारी पुन्हा मिळणार का, अशी चर्चा होती. मध्यंतरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या साथीने ते सेनेत जातील, अशा वावड्याही होत्या. मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यासमोर कोण, हा प्रश्न गुरुवारी सायंकाळी सुटला. गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील असलेले साहित्यिक लहू कानडे यांना सेनेची उमेदवारी मिळाल्याचे वृत्त आहे. कानडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गुरुवारी सायंकाळी सेनेचा एबी फॉर्म घेवूनच आपण मातोश्रीच्या बाहेर पडलो, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
अकोले मतदारसंघात सेनेने मधुकर तळपाडे यांना उमेदवारी दिल्याचे वृत्त हाती आले होते. त्यामुळे सेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अशोक भांगरे यांनी तातडीने समर्थकांची बैठक घेतली होती.