अस्तगाव : केलवड (ता. राहाता) येथील जनावरांचा मृत्यू घटसर्प आजारातून झाला आहे, असे निरीक्षण पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. तसेच निरोगी जनावरांचे लसीकरण सुरू केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण हरिषचंद्रे यांनी दिली.
केलवड गावात शनिवारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजारी व निरोगी जनावरांवर जलदगतीने कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडून मृत जनावरे पशुपालकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन अधिकारी यांनी केलवड गावात दररोज पशुवैद्यकीय अधिकारी नेमले असून ते गावातील जनावरांची तपासणी करून लसीकरण करीत आहेत. तसेच प्रशासनाकडून बाधित जनावरांसाठी औषधे पुरविण्यात येत आहेत.
घटनास्थळी भेट देण्यास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण हरिषचंद्रे, नाशिक विभागीय अधिकारी डॉ. ए. जे. ठाकरे, कृषी विज्ञान शास्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पंचायत समिती पशू अधिकारी किशोर शेळके, पशुसंवर्धन अधिकारी शैलेश बन, पशुवैद्यकीय अधिकारी रामभाऊ पवार, डॉ. विठ्ठल विखे, बाळासाहेब गमे, संदीप गमे, अंजाबाप्पू जटाड, डॉ. विकास गमे, डॉ. विजय चौधरी, डॉ. शरद गमे उपस्थित होते.
..............
जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर जनावरांना घटसर्प हा आजार झाल्याचे लक्षात येत आहे. २५० निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांसाठी सोडा व चुना वापरावा जेणेकरून इतरांना हवेतून आजाराचा संसर्ग होणार नाही. गावात हा आजार कसा आला, याविषयी चौकशी केले जाईल. परंतु सध्या जनावरे वाचवण्यावर आमचे लक्ष राहील.
-डॉ. अरुण हरिषचंद्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकार, अहमदनगर
-----------
शालिनी विखे यांची भेट
घटसर्प या आजारात मृत्यू पावलेल्या जनावरांबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी केलवड येथे भेट दिली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली. शालिनी विखे मंगळवारी पशुपालकांना मदत करण्यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
----
पोळ्याचा दिवस निराशेत मावळला
सोमवारी पोळ्याच्या दिवशी दोन गायी व दोन शेळ्या दगावल्या असल्याने जनावरे मृत्यूचा एकूण आकडा सतरावर पोहोचला आहे. त्यामुळे केलवड गावातील पशुपालकाचा पोळ्याचा दिवस निराशेत मावळला आहे.
----
०६ शालिनी विखे
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी सोमवारी केलवडमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.