अहमदनगर : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झालेला असून, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे व भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केली.
किरण काळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ३ ऑगस्ट रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी सातपुते यांच्यासह इतरांनी केली. यावेळी नगरसेवक मदन आढाव, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मात्र मी कुठेही पळून गेलेलो नाही अथवा फरार नाही. मी नगरमध्ये आहे. तसेच मी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन घेणार नाही, कारण मी गुन्हा केलेलाच नाही. असे काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
--------
फोटो ०६ एसपी
ओळी- किरण काळे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याच्या संदर्भात शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.