जुन्या वादातून शेजाऱ्यानेच केला युवकाचा खून

By सुरेंद्र राऊत | Published: April 30, 2024 03:12 PM2024-04-30T15:12:07+5:302024-04-30T15:20:18+5:30

दोन वर्षापूर्वीच्या घटनेचा वचपा : लोहारातील पंचशीलनगरमध्ये थरार

The neighbor killed the youth due to an old dispute | जुन्या वादातून शेजाऱ्यानेच केला युवकाचा खून

Neibouror's dispute turns into Murder

यवतमाळ : शेजार धर्मात कोणताही वाद नको असे सांगितले जाते. शेजाऱ्याशी असलेला वाद कोणत्या टोकाला जाईल, याचा नेम नाही. शहरातील लोहारा परिसरातील पंचशील नगर येथे शेजारच्या भांडणातूनच युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दोन वर्षापूर्वी मृतकाने आरोपीवर चाकूहल्ला केला होता. याच घटनेचा वचपा काढण्यात आला. 


जय विजय पाटील (२६) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. त्याचा शेजारी राहणाऱ्या दिगांबर उर्फ दीक्षित हिरणवाडे याच्याशी वाद होता. दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. दोन वर्षापूर्वी शुभेच्छा फलक फाडल्यावरून प्रकरण विकोपाला गेले. त्यावेळी जय पाटील याने चाकूहल्ला करून दिगांबर हिरणवाडे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठीत खुपलेला चाकू घेऊन दिगांबर शासकीय रुग्णालयात पोहोचला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचला. मात्र शेजाऱ्यातील वाद धुमसत राहिला. जुन्या हल्ल्याचा वचपा काढण्याच्या प्रतीक्षेत दिगांबर होता. मंगळवारी त्याने जय पाटील हा ड्युटीवरुन परत आला असता त्याच्यावर चाकूने वार केले. यात जय गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात आणले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे लोहारा पोलिसांकडून सांगण्यात आले. 


घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. किरकोळ कारणाने वाढत गेलेल्या वादातून हकनाक एकाचा बळी गेला आहे, या प्रकरणात वृत्तलिहिस्तोवर पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

 

Web Title: The neighbor killed the youth due to an old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.