ससाणीत लेकी-जावयांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:13 PM2018-05-28T22:13:49+5:302018-05-28T22:13:49+5:30
पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले. २२ मे रोजी रात्री बारा वाजता दुष्काळाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे महिलांनी दहन केले. सासुरवासीनी झालेल्या गावच्या लेकी जावयांनाही श्रमदानासाठी बोलवण्यात आले. अधिक मासात श्रमदान करून अनोखा पायंडा येथील जावयाने घातला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पन्नास जोडप्यांना एकाच व्यासपिठावर गावाच्यावतीने पाय धुवून अहेर आणि धोंडफळाची अनोखी सामूहिकपणे भेट देण्यात आली. दुसऱ्याची लेक ही माझ्या लेकीप्रमाणे आहे. आपण सर्वांनी या पवित्र नात्याला जपले पाहिजे हा मूल्यसंवर्धनाचा संदेश ससाणी वासियांनी दिला. या प्रसंगी लेकी आणि जावयांचे मनोगत घेण्यात आले. गावाच्यावतीने मु.अ.पुसनाके, शिक्षक राजेंद्र गोबाडे, कृषीसहाय्यक कुंचटवार यांचा सपत्निक आणि ग्रामसेवक जंगमवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वॉटर हिरो विशाल आडे, बंधन सोनडवले, आशिष भगत, दिलीप नगराळे, सौ. रंजना कातकडे, शितल बागेश्वर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिल्लीवरून व्हिडिओकॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. राजू तोडसाम, तहसिलदार जी.के. हामंद, जि.प. सदस्य आशिष लोणकर, गटविकास अधिकारी आरेवार, वाडगे, विकासगंगा संस्थेचे आणि एफ.ई.एस.चे अधिकारी, कार्यकर्ता गुड्डू शुक्ला, आकाश जाधव, पिंटू उगले, नामपेल्लीवार, मंगळे उपस्थित होते.
आज सामाजातील लोप पावत चाललेला एकोपा ,सामाजिक सौदार्य टिकवून वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे.असा मोलाचा संदेश ससाणीवासियांनी दिला. लेकी व जावयांनी दुष्काळ निवारणासाठी पाणी फाऊंडेशनच्या अभियानात उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. या कामात त्यांनीही खारीचा वाटा उचलला.