पुसदच्या नवीन वसाहतीत नाल्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:34 PM2018-03-14T22:34:43+5:302018-03-14T22:34:43+5:30
नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये नाल्यांचा अभाव असल्याने ठिकठिकाणी गटार साचले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
ऑनलाईन लोकमत
पुसद : नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये नाल्यांचा अभाव असल्याने ठिकठिकाणी गटार साचले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. समतानगर, बंजारा कॉलनीतील संतप्त नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.
येथील बंजारा कॉलनीतील समता नगर हे नवीन ले-आऊट आहे. येथे सांडपाण्याच्या नाल्यांचा अभाव आहे. येथील नागरिकांनी नाल्यांसाठी वारंवार नगरपरिषदेला निवेदन दिले परंतु उपयोग झाले नाही. उलट यावर कळस म्हणजे नगरपरिषदेने बंजारा कॉलनीतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली खोदकाम केले. या कॉलनीतील सर्व पाणी समतानगर परिसरात वाहून आले. त्यामुळे या भागात पाण्याचे डबके साचले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची भीती आहे. तसेच या सांडपाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद उद्भवत आहे. सांडपाण्याच्या नालीचे काम तात्काळ करावे अन्यथा उपोषणाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यानिवेदनावर श्रीकांत भागवत, लक्ष्मण कांबळे, संगीता जाधव, आर.बी. कावळे, काशीराम राठोड, संतोष पवार, प्रदीप पवार, श्रीकांत जोशी, भगवान देशमुख, शंकर नंदनवार, एस. एम. खंडाळे, प्रकाश खंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पालिकेवर भार
पुसद शहराचा झपाट्याने विकास होत आहे. नवनवीन वसाहती तयार होत आहे. परंतु या वसाहतीत बिल्डर कोणत्या सुविधा देत आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी संपूर्ण विकास कामांचा भार पालिकेवर येऊन पडतो. नागरिकही नगरपरिषदेकडेच धाव घेतात.