सखींनो, तुमचे जीवन अमूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:39 PM2017-11-20T22:39:14+5:302017-11-20T22:41:11+5:30

महिला ही आपल्या संसाराचा कणा असते. स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असते.

Have fun, your life is priceless | सखींनो, तुमचे जीवन अमूल्य

सखींनो, तुमचे जीवन अमूल्य

Next
ठळक मुद्देरोहिणी पाटील : लोकमत सखी मंचतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महिला ही आपल्या संसाराचा कणा असते. स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असते. ती आजारी असेल तर संपूर्ण घरात शुकशुकाट पसरतो. त्यामुळेच सखींनो, तुमचे जीवन अमूल्य आहे. तुम्ही खूप शिकले पाहिजे. आरोग्य जपले पाहिजे, असे आवाहन नागपूरच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रोहिणी पाटील यांनी केले.
लोकमत सखी मंच तर्फे रविवारी येथील शक्तीस्थळावर सन्मान सोहळा दिमाखात पार पडला. त्यावेळी डॉ. पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्र गाजविणाऱ्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रोहिणी पाटील म्हणाल्या, २०१६ मध्ये अशाच एका कार्यक्रमात सखी मंचने माझा सन्मान केला होता. आपल्याला माहितही नसते, पण लोकमत आपल्या कामाचे निरीक्षण करीत असतो. त्यातूनच माझा सन्मान झाला, आज अनेकींचा होतोय. पुरस्कार मिळाल्यावर आपल्याला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि आपण इतरांसाठी प्रेरणास्थान बनतो. आपल्यासारख्या महिलांचे कार्य लोकांसमोर आणण्याचे काम लोकमत करीत आहे. यालाच ‘वूमेन एम्पॉवरमेंट’ म्हणतात. मला स्वत:ला कॅन्सर झाला होता. मृत्यूशी झुंज देऊन मी आज तुमच्यासमोर उभी आहे. मी ज्या वेदना सोसल्या, त्या इतरांना होऊ नये यासाठी नागपुरात आम्ही ‘स्नेहांचल’च्या माध्यमातून काम करतो. कॅन्सरग्रस्तांचा जिथे उपचार थांबतो, तिथूनच त्यांची खरी कुचंबना सुरू होते. क्षणा-क्षणाला ते मरण अनुभवत असतात पण मृत्यू येत नाही. त्यांचा तो शेवटचा प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही काम करतो. महिला आपल्या जबाबदाºयांमध्ये गुरफटून आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण तसे करू नये. कारण तुम्ही कुटुंबाच्या ‘बॅक बोन’ आहात. यू आॅल आर प्रेशियस, अशा शब्दात डॉ. पाटील यांनी प्रत्येक महिलेचे महत्त्व विशद केले.
बंधने झुगारा : माधुरी आडे
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे म्हणाल्या, सखी मंचच्या माध्यमातून राज्यात स्त्रीशक्तीला सशक्त करण्याचे काम सुरू आहे. एकविसाव्या शतकात वावरताना आपण राष्ट्रविकासाचा मोठ्या प्रमाणात विचार करतो. पण ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा आपण या राष्ट्रविकासात सहभाग घेतो का? आजही अनेक महिलांना चूल आणि मूल यातच जखडून ठेवले जाते. त्यावरही मात करीत महिला विविध क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यात सर्वोच्च स्थानी जाण्याचा प्रयत्न करा. आपली शक्ती ओळखून महिलांनी बंधने झुगारली पाहिजे.
संघर्ष, अभ्यास महत्त्वाचा : कांचन चौधरी
नगराध्यक्ष कांचन चौधरी म्हणाल्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महिलांनी वाटचाल करावी. भारतीय महिला आज अंगणवाडी ते अंतराळ अशा सर्व क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. लोकमतने त्यांना प्रेरित केले आहे. महिला आपल्या कर्तृत्वाने सन्मानास पात्र ठरत आहेत. शासनही त्यांच्या पाठीशी आहे. मी आधी गृहिणी होते, आता नगराध्यक्ष आहे. जबाबदारी आल्यावर सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. पुढे जाण्यासाठी संघर्ष आणि अभ्यास या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपल्या कामात सर्वस्व झोकून आपली छाप सोडली पाहिजे. स्वच्छ यवतमाळसाठी नगरपालिका लवकरच मोहीम हाती घेणार आहे. त्यात सखींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शाबासकीतून प्रेरणा मिळते : सुचिता पाटेकर
शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर म्हणाल्या, लोकमत सखी मंचने तळागाळातील महिलांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. अशाच कार्यक्रमात लोकमतने माझाही सन्मान केला. तेव्हा मी शिक्षिका होते. शिक्षा आणि शाबासकी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शाबासकी मिळाली की काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिला संघर्ष करीत आहेत. त्यामुळे यवतमाळच्या सर्वच महिलांना असे व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संघर्षाला दिशा देण्याचा प्रयत्न : सीमा दर्डा
अध्यक्षीय भाषणातून लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी ‘नारी महापुरुषोकी जननी’ अशा शब्दात महिलांची महती सांगितली. त्या म्हणाल्या, आपल्या समाजातील महिलांची आजवरची वाटचाल बघितली तर त्यांनी अक्षरश: शून्यातून विश्व निर्माण केले आहे. घराच्या एका कोपऱ्यापुरती मर्यादित असलेली महिला आज घराचा उंबरा ओलांडून समाजाचे नेतृत्व करीत आहे. अशा महिलांच्या संघर्षाला योग्य दिशा देण्याचे काम लोकमत सखी मंचच्या माध्यमातून केले जाते. आज यवतमाळच्या महिलांनी सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. त्यांच्या कार्याला सलाम करतानाच त्यांचे कार्य सर्व समाजापुढे आणून इतरही महिलांना प्रेरित करण्याचा उद्देश असल्याचे सीमा दर्डा यांनी सांगितले.
कार्यक्रमाला लोकमत कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, प्राचार्य शंकरराव सांगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुंदे यांनी केले. सूत्रसंचालन कल्पक चिंचोळकर यांनी केले. तर आभार रवींद्र चांदेकर यांनी मानले.
पुसदच्या सुनिता केळकर यांना जीवनगौरव
गेल्या अर्धशतकापासून पुसदच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया सुनिता केळकर यांना लोकमत सखी सन्मान जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, आजच्या काळात केवळ विद्यार्थी घडविणे पुरेसे नाही, तर माणूस घडविला पाहिजे. या वयातही माझी काम करण्याची जिद्द संपलेली नाही. पुरस्काराच्या निमित्ताने माझे तत्त्व समाजमान्य झाले याचा आनंद होत आहे. महिलांनी स्वत:मधले गुण ओळखून मेहनत केली पाहिजे. कारण तीच समाज पुढे नेणार आहे.
या सखींनी पटकावला पुरस्कार
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रोहिणी पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर आणि लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिला-तरुणींना सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात सामाजिक कार्यासाठी नेर येथील कांचन वीर, शौर्य गटातील पुरस्कार मोहिनी डगवार, क्रीडा गटातील पुरस्कार यशश्री खडसे, आरोग्यसेवेकरिता हिवरी येथील सुभाबाई टिकनोर, शैक्षणिक गटातून चिचगावच्या शिक्षिका मिरा टेकाम, उद्योग-व्यवसाय गटातून अपर्णा परसोडकर तर संस्कृती-साहित्य गटातील सखी सन्मान पुरस्कार चारुलता पावसेकर यांनी पटकावला. पुरस्कार स्वीकारताना या सखींनी समाजाप्रती आपली बांधिलकी स्पष्ट केली.

Web Title: Have fun, your life is priceless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.