८०० कोटी कर्जाच्या पुनर्गठणाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:03 PM2019-05-05T22:03:14+5:302019-05-05T22:03:58+5:30

संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत.

800 crore loan restructuring movements | ८०० कोटी कर्जाच्या पुनर्गठणाच्या हालचाली

८०० कोटी कर्जाच्या पुनर्गठणाच्या हालचाली

Next
ठळक मुद्दे२०४८ गावांत अंमल : ३० जूनपर्यंत कर्ज परतफेडीची मुदत वाढविली

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत. जिल्ह्यातील कर्जवसुलीची स्थिती पाहता ८०० कोटी रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याच्या हालचाली बँकांना सुरू केल्या असून ३० जूननंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व २०४८ गावांमध्ये कर्ज पुनर्गठणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना १२११ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. सततच्या दुष्काळी स्थितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने दुष्काळ निवारणाचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांमधील कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना बँकांना मिळाल्या आहेत. यानुसार बँकांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.
१२११ कोटींपैकी ३०० कोटी रूपयांची परतफेड शेतकऱ्यांनी केली आहे. ९०० कोटी रूपयांची परतफेड अद्याप बाकी आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल. जे शेतकरी २०१८ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकले नाही, अशा त्यांच्याच कर्जाचे पुनर्गठण होणार आहे.
बँकांच्या प्राथमिक अंदाजानुसार एक महिन्यात १०० कोटींच्या कर्जाची परतफेड झाल्यास ८०० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण बँकांना करावे लागणार आहे.
पाच हप्त्यात करावी लागणार परतफेड
कर्जाचे पुनर्गठण करताना बँक शेतकऱ्यांना तितक्याच रूपयांचे कर्ज नव्याने देणार आहे. थकित कर्जाचे पाच समान हप्ते पाडून त्याची परतफेड शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी करायची आहे. सोबतच नवीन घेतलेले कर्जही आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावे लागणार आहे. दोन कर्जांची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांना मिळणार असले तरी दोन कर्जाचा बोझा सातबाऱ्यावर राहणार आहे.
पुनर्गठणानंतरही प्रश्न कायमच राहणार
जुन्या कर्जाचे पुनर्गठण होणार असले तरी याबाबत अद्यापही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमाची अवस्था कायम आहे. बँकेची यंत्रणा कर्जाची वसुली पाच समान हप्ते पाडून करणार आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ जाहीर करून सवलती द्यायच्या आणि दुसरीकडे कर्ज वसुली सुरू करायची, असा फंडा शासनाने वापरला आहे. शिवाय पुढच्या हंगामासाठी नवे कर्ज कधी मिळणार याबाबत निश्चित तारीख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाची पेरणीही उधार-उसनवारीवरच करावी लागणार आहे. बँक स्तरावर पुनर्गठनाच्या हालचाली सुरू असल्यातरी शेतकऱ्यांच्या घरात मात्र उधारीसाठी प्रयत्न सुरु आहे.

Web Title: 800 crore loan restructuring movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.