जिल्हा परिषदेतील ६५० शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:56 AM2017-08-23T00:56:37+5:302017-08-23T00:57:15+5:30
जिल्हा परिषदेच्या जवळपास ६५० शिक्षकांच्या बदल्या होण्याचे निश्चित झाले. येत्या दोन दिवसांत शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या जवळपास ६५० शिक्षकांच्या बदल्या होण्याचे निश्चित झाले. येत्या दोन दिवसांत शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी विविध कारणांनी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. त्यामुळे यंदाही बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्यातील १९ जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने बदल्या होतील की नाही, याबाबत संभ्रम होता. त्यांच्या याचिकांवरील सुनावणीनंतर बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले होते.
जिल्हा परिषदेच्या २१०० शाळांमध्ये कार्यरत तब्बल पाच हजार १५२ शिक्षक विविध निकषांनुसार बदलीस पात्र ठरले आहेत. मात्र प्रथम विशेष संवर्ग, भाग एक व दोनमधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. त्यानंतर भाग तीनमधील शिक्षकांच्या बदल्या होतील. घटस्फोटीत, परितक्त्या, विधवा, दीर्घ आजारी, दिव्यांग, वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले, पती-पत्नी एकत्रिकरण आदी शिक्षक-शिक्षिकांचा यात समावेश राहणार आहे. यातून जवळपास ६५० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.
या बदल्यांमध्ये भाग एकमधील अंदाजे २५०, भाग दोनमधील १००, तर भाग तीनमधील २०५, अशा जवळपास ५५० शिक्षकांच्या बदल्या निश्चित आहे. यानंतर भाग चारमधील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे सांगण्यात आले.
भाग चारसाठी समुपदेशनचा मार्ग
भाग एक, दोन व तीनमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर भाग चारमधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. कारण त्यांच्या शाळांवर पहिल्या भाग एक, दोन व तीनमधील शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे भाग चारमधील अनेक शिक्षक त्यांच्या शाळांवर अतिरिक्त ठरतील. त्यामुळे त्यांच्या बदल्या केल्या जातील. त्यासाठी दिवाळाीनंतरचा मूहूर्त उजाडण्याची शक्यता आहे. या शिक्षकांना समुपदेशनाने रिक्त जागांवर नियुक्ती दिली जाण्याचे संकेत आहे.