कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:34 AM2017-10-23T00:34:09+5:302017-10-23T00:35:04+5:30

वाशिम : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.

Debt-free farmers will get Rabi Crop Loan! | कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

Next
ठळक मुद्दे कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.
 वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश केला जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, अचूक अर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. 
१८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 
३0 ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळल्यानंतर या शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रब्बी हंगामात पीक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या खरिपाच्या तुलनेत अत्यल्प असते. तथापि, रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी नोंदविल्यानंतर कर्जमुक्त झालेल्या शेतकर्‍यांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित बँकेतून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व अर्जांची पडताळणी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार आहे. साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. 

Web Title: Debt-free farmers will get Rabi Crop Loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी