रस्त्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे उपोषण
By admin | Published: March 22, 2017 01:15 AM2017-03-22T01:15:20+5:302017-03-22T01:15:20+5:30
सफाळे परिसरातील तिघरे-अंबोडे, खटाळी, दातीवरे ई. गावातील अनेक मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक
पालघर : सफाळे परिसरातील तिघरे-अंबोडे, खटाळी, दातीवरे ई. गावातील अनेक मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.ह्या बाबत अनेक अर्ज, निवेदने, लेखी मागणी करूनही ढिम्म प्रशासना विरोधात पालघर तालुका काँग्रेस सरचिटणीस निलेश राऊत यांनी पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील सफाळे जवळील अनेक भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून काही रस्तेच गायब झाले आहेत. दांडा-खटाळी रस्त्यांचा वापर मुंबई, ठाणे येथून सफाळेमार्गे केळवे या पर्यंटन स्थळाला भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक करीत असतात. महामार्गावरून मोठया अंतराचा वळसा घालून जाण्याऐवजी वेळ आणि डिझेल चा खर्च वाचण्याच्या दृष्टीने हा रस्ता खूपच सोयीचा असल्याने पर्यटक त्याला प्राधान्य देत असतात. तसेच ऐतिहासिक भवानगड व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, भव्य बुद्धविहार पाहण्यासाठी हि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र ह्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. साधी दुचाकीही ह्या रस्त्यावरून नेणे अत्यंत क्लेशदायक बनले आहे.ह्या रस्त्याबरोबर दातीवरे, कोरे, मधुकर नगर, नगावे पाडा, वेढी, खार्डी इ. गावाला जाणाऱ्या रस्त्यांची अशीच दुर्दशा झाली आहे.
त्यांची दुरूस्ती करावी यासाठी आजपर्यंत अनेक निवेदने, अर्ज करून आमसभेत मुद्दे मांडूनही काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी आज लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. याचवेळी केळवे गावातील मांगेला आळी व बारी वाडा येथील पाणीपुरवठा व नारतेल येथील रस्त्याबाबत प्रशासनाच्या उदासिनतेबाबत काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुनील इंगोले यांनीही उपोषण केले. (वार्ताहर)