ग्रा.पं. ने पाडली वादग्रस्त इमारत
By admin | Published: August 24, 2014 12:10 AM2014-08-24T00:10:17+5:302014-08-24T00:10:17+5:30
आष्टी(श.) तालुक्यातील अंतोरा येथील वासुदेव मोहोड यांची २०११ पासून वादग्रस्त असलेली इमारत न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी २० आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर ग्रामपंचायत
वर्धा : आष्टी(श.) तालुक्यातील अंतोरा येथील वासुदेव मोहोड यांची २०११ पासून वादग्रस्त असलेली इमारत न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी २० आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पोकलॅण्डच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्वसूचना न देता इमारत पाडल्याने आपले ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप वासुदेव मोहोड यांनी केला आहे.
अंतोरा येथील रहिवासी वासुदेव मोहोड व दुर्गा मोहोड यांना वॉर्ड क्रमांक तीनमधील भूखंड क्रमांक १२७ वरील बांधकाम अनधिकृत असल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने २६ मार्च २०११ ला नोटीस दिला होता. तसेच ते बांधकाम ३० दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोहोड यांनी आष्टी येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रविष्ट केले. याविरुद्ध अंतोरा ग्रामपंचायतीने नागपूर उच्च न्यायालयात दिवाणी पुनर्विचार याचिका दाखल केली. न्यायमूर्ती ए.बी. चौधरी यांनी १६ जून २०१४ ला ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने निकाल देत आष्टी(श.) न्यायालयातील खटला खारीज केला. त्यानंतर आयुक्त अप्पासाहेब धुलाज यांनी १९ आॅगस्टला ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला. यात मोहोड यांच्याकडे मालकी हक्काचा पुरावा नसल्याने २६ एप्रिल २०११ चा नोटीस कायम कारणार आहे. त्यानुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, अशी माहिती न्यायालयात ग्रामपंचायतीची बाजू मांडणारे अॅड. प्रकाश गायकवाड यांनी दिली.
ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच अधिकाऱ्यांना न कळविता कारवाई केली असा आरोप मोहोड यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या घरात १०० पोते सोयाबीन, ६० पोते चणा, दुचाकी व शेतोपयोगी साहित्य होते. अचानक घर पाडण्याने ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मोहोड यांचे म्हणणे आहे. या नुकसानाची भरपाई कोण देणार, न्यायालय मध्यरात्री कारवाई करण्यास सांगते काय, असे प्रश्न उपस्थित करीत न्यायालयीन प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे. अंतोरा ग्रामपंचायतीची ही कारवाई वैयक्तिक आकसातून केल्याचा आरोप वासुदेव मोहोड यांनी केला आहे.(शहर प्रतिनिधी)