हल्लाबोल..! कुणाचा? कुणावर? - कारण-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:20 AM2018-04-04T00:20:37+5:302018-04-04T00:20:37+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्टÑवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि

Attacking ..! Who's that? On the key? - Reasons - Politics | हल्लाबोल..! कुणाचा? कुणावर? - कारण-राजकारण

हल्लाबोल..! कुणाचा? कुणावर? - कारण-राजकारण

Next

- श्रीनिवास नागे
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि घड्याळाचे काटे मंदावले. आता वरिष्ठ नेते भाजपशी झुंजण्यासाठी ‘हल्लाबोल’ यात्रा काढत आहेत, पण पक्षांतर्गत लाथाळ्या, गटबाजी आणि एकमेकांवर ‘हल्लाबोल’ करण्याच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा पक्षाला कितपत ऊर्जा देणार, हा प्रश्नच आहे.

पक्ष स्थापनेपासून म्हणजे १९९८पासून मागील लोकसभा निवडणुकीपर्यंतराष्ट्रवादी पक्ष सांगली जिल्ह्यात सर्वांत बलदंड समजला जायचा. दिवंगत आर. आर. पाटील आणि जयंत पाटील हे राज्य मंत्रिमंडळातील हेवीवेट नेते पक्षाची जबाबदारी पेलत होते. अख्ख्या जिल्ह्यावर राष्ट्रवादीची पकड होती. राज्यातल्या पक्षबांधणीची जबाबदारी आर. आर. आबांवर, तर जिल्ह्यातील पक्षसंघटन जयंतरावांकडं, असं ‘अंडरस्टँडिंग’ होतं. मात्र जयंतरावांच्या तिरकस चालींमुळं गटबाजी सुरू झाली आणि आबा गटाशी त्यांचं शीतयुद्ध सुरू झालं.

याचदरम्यान आर. आर. आबा आणि जयंतरावांची जिल्ह्यावरची पकड ढिली झाली होती, दुसºया फळीच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटत होते. त्यातूनच लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या दुसºया फळीतले नेते संजयकाका पाटील, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख हे भाजपमध्ये, तर अनिल बाबर शिवसेनेत गेले. जिल्हा परिषदेवेळी आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुखांनीही ‘कमळ’ जवळ केलं. सुरुवातीला राष्टÑवादीत असणारे शिवाजीराव नाईक, मदन पाटील, अजितराव घोरपडे यांनी तर कधीच पक्ष सोडला होता. नाईक आणि मदनभाऊ हे दोघं जयंतरावांच्या कथित ‘चाणक्य नीती’वर तोफ डागूनच बाहेर पडले होते, बाकीच्या नेत्यांतील बहुतांश थेट जयंतरावांचंच नेतृत्व मानत होते. (विलासराव जगताप, अजितराव घोरपडेंना विचारा, हवं तर!) त्यामुळं याचं उत्तरदायीत्व कुणाकडं, या प्रश्नावेळी बोट दाखवलं जातं, ते जयंतरावांकडंच!

आबांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचं पालकत्व जयंतरावांकडं देण्याचा प्रयत्न झाला. जयंतरावांचे विश्वासू साथीदार दिलीपतात्या पाटील यांच्याकरवी हे जुळवून आणण्याचं घाटत होतं, पण आबा गटानं तो यशस्वी होऊ दिला नाही. दिलीपतात्यांची अतिशिष्टाई त्याला कारणीभूत ठरली! परिणामी आबांच्या पश्चात आमदार बनलेल्या सुमनताई पाटील यांच्या गटाचे सूर जयंतराव गटाशी कधीच जुळले नाहीत.

जयंतरावांनी स्वत:चा गट मजबूत करण्यासाठी जिल्हाभरात हालचाली केल्या, मात्र फारसं हाती लागलं नाही. जत, मिरज, सांगली, पलूस इथं थोडा गट शाबूत राहिला. मानसिंगराव नाईक यांच्या साथीनं शिराळ्यात, तर स्वत:च्या इस्लामपूर मतदारसंघात पक्षाला मजबुती देण्यात जयंतराव यशस्वी ठरले. तथापि विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झाली. पुढं नगरपलिकेवेळी पक्ष आणखी पिछाडीवर गेला. इस्लामपुरात तर जयंतरावांना स्वत:चा नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही! जिल्हा परिषद हातातून गेली. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष तिसºया क्रमांकावर फेकला गेला.
जाता-जाता : एकेकाळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या दिलीपतात्या पाटील यांना राष्टÑवादीचं जिल्हाध्यक्षपद पहिल्यापासूनच खुणावतंय. जयंतरावांनी विलासराव शिंदेंना जिल्हाध्यक्षपद देऊन चतुराई दाखवली. सुरुवातीपासून आतापर्यंत शिंदेच अध्यक्ष आहेत. शिंदे गटाला खूश ठेवून स्वत:चा विधानसभा मतदारसंघ सुरक्षित करण्याचा, शिंदेंच्या ताब्यात असलेल्या आष्टा नगरपालिकेच्या राजकारणात शिरकाव करण्याचा जयंतरावांचा हेतू त्यामागं होता. पण त्यामुळं

दिलीपतात्या पाटील हिरमुसले!
आष्टा नगरपालिका आणि तिथल्या दोन-तीन जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे-पाटील गटात नेहमीच कुरबुरी सुरूच असतात. त्यातून दिलीपतात्या गटाची आणि शिंदे गटात अनेकदा हातघाईही झालीय. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे यांचे पुत्र आणिराष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार वैभव यांना जयंतरावांच्या गटानंच पाडलं. तेही अपक्षाला निवडून आणून. ही खेळी जयंतरावांना विचारल्याशिवाय खेळली गेली असेल का? त्यातून वैभव भाजपमध्ये गेले. आता वडील राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मुलगा भाजपचा उपाध्यक्ष! त्यातच प्रकृती अस्वास्थ्यामुळं विलासराव शिंदे पक्षकार्यात म्हणावे तेवढे सहभागी नसतात. दिलीपतात्यांनी हे हेरलंय. त्यामुळं ते आणि त्यांचे कार्यकर्ते शिंदे गटावर अधूनमधून ‘हल्लाबोल’ करत असतात. ‘कुठं आहेत जिल्हाध्यक्ष?’ असं पक्षाच्या बैठकीत विचारण्याचं धाडस त्यातूनच आलंय...
ताजा कलम : महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय, पण पक्षातली गटबाजी उफाळलीय. जयंतरावांनी संजय बजाज यांच्याकडं शहरातील पक्षाची सूत्रं दिलीत खरी, पण त्यांच्याविरोधात झाडून सगळी मंडळी एकत्र झालीत. बजाज यांचा दुसºया गटाशी उभा दावा! पण दुसºया गटानं तक्रारी करूनही जयंतराव निर्णय घेत नाहीत. खुद्द त्यांच्यांसमोर दोन्ही गटांनी एकमेकांवर कित्येकदा ‘हल्लाबोल’ केलाय. आता या यात्रेत दोन दिवस वरिष्ठ नेत्यांसमोर दिलजमाई दाखवली जाईलही, पण नंतर काय...?


दिलीपतात्यांची महत्त्वाकांक्षा...
खरं तर आमदार होण्याची (कसंही करून) दिलीपतात्यांची महत्त्वाकांक्षा प्रबळ. पण त्यांची निष्ठा जयंतरावांशी. ते मूळचे राजारामबापूंचे अनुयायी. बापूंविषयीची कृतज्ञता, एकनिष्ठता, जयंतरावांची जरब आणि राजकीय अपरिहार्यता यामुळं बंडाचा झेंडा अनेकदा खांद्यावर घेताघेता राहिला. पण गेल्या वर्षीच्या विधानपरिषद निवडणुकीत मात्र तात्यांची सहनशीलता संपली. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांनी चक्क पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर (अजितदादा पवारांवर हं!) निशाणा साधला. पैसे असल्याशिवाय पक्षात स्थान मिळत नसल्याची मळमळ बाहेर पडली. त्या निवडणुकीत पक्षाची मतं जास्त असतानाही राष्टÑवादीचं पानिपत झालं... पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याचं सांगणारे दिलीपतात्या पाटील वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदानंतर सध्या जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सांभाळताहेत!

या नाराजीचं काय?
पलूस-कडेगावात राष्टÑवादी जिवंत ठेवणारे अरुण लाड विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून नाराज आहेत. त्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांची मिलीभगत असते. (अर्थात पतंगराव कदम गटाला विरोध म्हणूनच लाड-देशमुख एकत्र असतात.) जिल्हा बँकेत जयंतरावांनी भाजपसह काँग्रेसच्या एका गटाशी हातमिळवणी केली. तिथं जयंतरावांनी दिलीपतात्या पाटील यांना अध्यक्ष केलं, पण त्यामुळं शिराळ्याचे मानसिंगराव नाईक खट्टू झाले. आमदारकी गेल्यानंतर त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही ना!

Web Title: Attacking ..! Who's that? On the key? - Reasons - Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.