दुपारच्या प्रहरी थंडावली उद्योगनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:14 AM2018-04-05T03:14:01+5:302018-04-05T03:14:01+5:30

तापमानाचा पारा ‘चाळीशी’ला टेकला असताना कडक उन्हामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारच्या प्रहरी ओस पडल्याचे पहायला मिळत आहे.

 Noon Sentinel Thandavli Udyanagari | दुपारच्या प्रहरी थंडावली उद्योगनगरी

दुपारच्या प्रहरी थंडावली उद्योगनगरी

Next

भोसरी - तापमानाचा पारा ‘चाळीशी’ला टेकला असताना कडक उन्हामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारच्या प्रहरी ओस पडल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लग्नसराई असताना तसेच अक्षयतृतीयेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बाजारपेठ मात्र थंडावल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाळा असह्य होत चालला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था तर मेमध्ये काय चित्र असेल, अशी धास्ती शहरवासीयांना आहे. सकाळी आठ वाजताच उन्हाचे चटके जाणवतात. अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवते. परिणामी दुपारी अकरा ते सायंकाळी पाच, साडेपाचपर्यंत बाजारपेठा ओस पडत आहेत. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, रावेत, चिखली, किवळे, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, निगडी आदी भागात कायम वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची अघोषित संचारबंदी दिसून येते. खरेदी लवकर आटोपती घेऊन अनेक जण घरचा रस्ता धरतात. सकाळच्या वेळी टपऱ्या, उपहारगृहांभोवती दिसणारी गर्दी देखील लवकर आटोपते घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट दिसून येतो. विशेष म्हणजे सध्या लग्नसराई असताना उन्हामुळे बाजारपेठ थंडावल्याचा विरोधाभास एप्रिलमध्ये अनेक वर्षांनंतर पहायला मिळत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
उलाढालीची सरासरी भरून काढण्यासाठी बहुसंख्य व्यापाºयांनी सकाळी लवकर दुकाने खुली करण्याचा आणि रात्री उशिराने बंद करण्याचा तोडगा काढला आहे. त्यामुळे शहराचे दैनंदिन जीवनमान सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत राहत असल्याचे
सध्या चित्र आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून वाहनांपर्यंत विविध वस्तूंची अगाऊ ‘बुकिंग’ केली जाते.

दुचाकीस्वारांचा जीव मेटीकुटिला

पिंपळे गुरव : उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. हे चटके सायकलस्वार व दुचाकीस्वारांना झळांच्या रूपाने सहन करावे लागतात. यामुळे दुचाकीस्वारांचा जीव मेटीकुटिला येत आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरू होतात. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ह्या झळा सहन कराव्या लागतात. नागरिकांना सकाळी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडावे लागते. तसेच दैनंदिन काम करणाºया कामगारांना मात्र या तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो आहे. दुपारच्या वेळी काम करणाºया कामगारांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. उष्णतेमुळे हवा प्रसरण पावते. उष्णतेमुळे ट्यूब फुटण्याचे प्रकारही वाढत आहेत. एकीकडे कामाची घाई तर दुसरीकडे उन्हाचे चटके ही मोठी तारेवरची कसरत दुचाकीस्वारांना करावी लागत आहे.
दुचाकीस्वारांना सूर्याच्या किरणांचे चटके, उष्ण हवा, तापलेले रस्ते आणि तापलेले इंजिन या सर्व गोष्टींचा दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक पुरुष व महिला या उन्हाच्या चटक्यापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा, तोंडावर रुमाल (ओढणी) व हातात हातमोजे वापरतात. कामाची घाई असल्यामुळे दुचाकीस्वारांना आपले वाहन भरधाव वेगाने दामटावे लागते, त्याचबरोबर उष्ण झळाही सहन कराव्या लागतात. वाहनांच्या वेगाबरोबर हवा मिळते ती मात्र उष्ण हवा मिळते. गरम भट्टीत असल्याचा अनुभव वाहनचालकांना येत आहे.

पुरुष व महिला या उन्हाच्या चटक्यापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा, तोंडावर रुमाल (ओढणी) व हातात हातमोजे वापरतात.

लिंबाचे भाव भिडले गगनाला

जाधववाडी : लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलोला दीडशे रुपये भाव वाढल्याने एरवी १० रुपयाला मिळणारे लिंबू सरबतही किमान १५ ते २० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कडक उन्हाळा त्यातच खिशाला झळ पोहचत असल्याने नागरिक व नोकरवर्ग नाराज आहे़ तसेच उसाच्या रसातून व हॉटेलमधूनही लिंबू गायब झाले आहे. लहान आकाराचे लिंबू दहा रुपयात केवळ दोनच मिळत आहेत. ऐन उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा सुरू असताना काहीतरी थंड पोटात ढकलावे अशी इच्छा बाळगणाºयांची चढ्या भावामुळे निराशा झालेली पाहायला मिळत आहे. काही दुकानदार थंड पाण्याच्या मिळणाºया बाटल्या मागे अतिरिक्त कोल्ड चार्जेस लावत असल्याने काहींनी आपल्याच घरातून थंड पाणी घेऊन बाहेर पडण्यास पसंती दिली आहे.
सध्या शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याने ऊन वाढण्या आधीच आपली कामे उरकून घर गाठावे ह्याकरिता प्रत्येक जण तयारीत असताना दिसून येत आहे़ त्यामुळे भर दुपारी वाहनांची संख्याही कमालीची घटली आहे. रस्ते ओसाड पडायला लागले आहेत, तुरळक प्रमाणात माणसे व वाहने दिसत आहेत. सूर्य नारायणाच्या प्रकोपापुढे आपल्याला अजून दोन महिने तग धरायचा आहे, त्याकरिता प्रत्येक जण ह्या महागाईत नवनवे फंडे शोधताना दिसला तर यात काही गैर नाही.

Web Title:  Noon Sentinel Thandavli Udyanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.