काय आहे PFI?, देशभरात NIA ची धाड; १०६ जण ताब्यात, महाराष्ट्रातही सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:30 PM2022-09-22T12:30:28+5:302022-09-22T12:37:14+5:30

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशभरात छापे टाकत आहे. हे छापे पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोक आणि ठिकाणांवर टाकले जात आहेत. एनआयएनं देशातील ११ राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित १०६ लोकांनाही अटक करण्यात आली आहे.

NIAने आतापर्यंत केरळमधून सर्वाधिक २२ जणांना अटक केली आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून २०-२० जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय तामिळनाडूमधून १०, आसाममधून ९, उत्तर प्रदेशमधून ८, आंध्र प्रदेशमधून ५, मध्य प्रदेशातून ४, पुद्दुचेरी आणि दिल्लीतून प्रत्येकी ३ आणि राजस्थानमधून २ जणांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएने पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्लीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांनाही अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, दहशतवादी फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आणि लोकांना संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांवर छापे टाकले जात आहेत.

पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये गझवा-ए-हिंदची स्थापना करण्याचा कट होता. याप्रकरणी एनआयएने नुकताच छापा टाकला होता. तेलंगणातील निजामाबादमध्ये कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली पीएफआय शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. याशिवाय कर्नाटकातील हिजाब वाद आणि प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येप्रकरणीही पीएफआय कनेक्शन समोर आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधामध्ये पीएफआयशी संबंधित लोकही सहभागी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण ही PFI म्हणजे काय? ती किती राज्यात सक्रिय आहे? काय काम करते? हे सगळं जाणून घेऊया.

२२ नोव्हेंबर २००६ रोजी तीन मुस्लिम संघटनांच्या एकत्रीकरणातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये केरळची नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूची मनिता नीती पसाराय यांचा समावेश होता. PFI स्वतःला एक ना-नफा संस्था म्हणून ओळख सांगते.

संस्था पीएफआयमधील सदस्यांच्या संख्येची माहिती देत ​​नाही. २० राज्यांमध्ये त्यांची युनिट्स असल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला, पीएफआयचे मुख्यालय केरळमधील कोझिकोड येथे होते, परंतु नंतर ते दिल्लीला हलविण्यात आले. OMA सलाम हे त्याचे अध्यक्ष आणि EM अब्दुल रहिमन हे उपाध्यक्ष आहेत.

PFI चा स्वतःचा गणवेश देखील आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी पीएफआय स्वातंत्र्य परेडचे आयोजन करते. २०१३ मध्ये केरळ सरकारने या परेडवर बंदी घातली होती. कारण PFI च्या गणवेशात पोलिसांच्या गणवेशाप्रमाणे तारे आणि चिन्हे आहेत.

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात २६ जुलै रोजी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेत्तारू यांची हत्या करण्यात आली होती. प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना रात्री नऊच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. प्रवीणने उदयपूरच्या कन्हैयालालच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्याचे तपासात समोर आलं. त्यामुळेच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एनआयएने छापेही टाकले. प्रवीणच्या हत्येशी पीएफआयचा संबंध असल्याचाही आरोप आहे.

PFI नेहमी वादात अडकली आहे. पीएफआय कार्यकर्त्यांवर दहशतवादी संघटनांशी संबंध येण्यापासून ते खुनापर्यंतचे आरोप आहेत. २०१२ मध्ये केरळ सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले की, PFI चा २७ खून प्रकरणांशी थेट संबंध आहे. यातील बहुतांश प्रकरणे आरएसएस आणि सीपीएम कार्यकर्त्यांच्या हत्येशी संबंधित आहेत.

PFI वर अनेकदा धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे, परंतु ते त्याचा इन्कार करतात. मात्र, २०१७ च्या इंडिया टुडे स्टिंग ऑपरेशनमध्ये, PFI च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अहमद शरीफ यांनी कबूल केले की, भारताला इस्लामिक राज्य बनवणे हे त्यांचे ध्येय आहे.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये शरीफ यांनी मध्यपूर्वेतील देशांकडून ५ वर्षांत १० लाख रुपयांचा निधी मिळाल्याची कबुलीही दिली होती. शरीफ यांनी कबूल केले होते की पीएफआय आणि सत्य सारणी यांना मध्यपूर्वेतील देशांमधून १० लाख रुपयांहून अधिक निधी दिला गेला आणि हा पैसा हवालाद्वारे त्यांच्याकडे आला.