दिल्ली विधानसभेच्या खाली सापडला बोगदा; थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो गुप्त रस्ता! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:53 PM2021-09-03T14:53:04+5:302021-09-03T14:58:22+5:30

दिल्ली विधानसभेत एक गुप्त रस्ता आढळून आला आहे. या रस्त्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि याचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा...

दिल्ली विधानसभेत गुरुवारी एक गुप्त सुरुंग आढळून आला आहे. दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोएल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बोगदा थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्य लढ्यात सैनिकांच्या ये-जा करण्यासाठी आणि नागरिकांच्या रोषापासून बचाव करण्यासाठी इंग्रजांनी ही सुरुंग खणली होती.

"जेव्हा मी १९९३ साली आमदार झालो तेव्हा या गुप्त रस्त्याबाबतची अफवा पसरली होती. विधानसभेतून थेट लाल किल्ल्यापर्यंत एक गुप्त रस्ता जातो असं म्हटलं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याबाबत कोणतीच स्पष्टता नव्हती", असं विधानसभा अध्यक्ष निवास गोयल म्हणाले.

आता गुप्त रस्त्याचं ठिकाण सापडलं असून त्याचं पुढचं खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. कारण गुप्त रस्ता अर्ध्याच रस्त्यात बंद झाला आहे. मेट्रोच्या कामांमुळे या सुरुंगाचे सर्व मार्ग बंद झाल्याचं म्हटलं जात आहे.

ज्या ठिकाणी आता दिल्ली विधानसभा आहे. १९१२ साली कोलकाताहून दिल्लीला राजधानी स्थलांतरित केल्यानंतर या भवनाला दिल्लीची विधानसभा म्हणून वापरलं जाऊ लागलं, असं सभापती राम निवास गोयल म्हणाले.

१९२६ साली या भवनाचा वापर कोर्ट म्हणून केला जाऊ लागला आणि इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना कोर्टात आणण्यासाठी या गुप्त रस्त्याचा वापर केला होता.

याच ठिकाणी एक फाशीची शिक्षा दिली जाण्याची खोली होती याची माहिती आधीच होती, असंही राम निवास गोयल म्हणाले. पण ही खोली याआधीच कधीच उघडण्यात आली नाही. आता स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त होतं आणि या खोलीचं निरीक्षण करण्याचा निर्णय मी घेतला. याठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचं मंदिर तयार करण्याचा विचार होता. जेणेकरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करता येऊ शकेल, असंही गोयल म्हणाले.

दिल्ली विधानसभेला एक इतिहास आहे आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा. त्यामुळे पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनापर्यंत पर्यटक आणि भारतीयांना फाशीची शिक्षा दिली जाणारी खोली पाहता यावी यासाठीचं काम सुरू आहे, असं गोयल यांनी सांगितलं.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक समृद्ध इतिहास आहे. या संदर्भातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याचा इरादा असून यातून पर्यटनाला देखील चालना मिळेल. तसंच ऐतिहासिक आठवणी जपल्या जातील असंही ते गोयल म्हणाले.