आधी सिद्धू-सलमान, आता संजय राऊत...लॉरेन्स बिश्नोई गँगचं 'ट्रिपल S' कनेक्शन जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 04:18 PM2023-04-01T16:18:47+5:302023-04-01T16:36:12+5:30

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आणि दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली. याआधी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्या प्रकरणाचा आरोप बिश्नोई गँगवर आहे.

सिद्धू मूसेवालानंतर याच गँगनं बॉलीवूड स्टार सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता पोलिसांच्या माहितीनुसार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आला आहे. ज्यात दिल्लीत आलास तर AK47 नं उडवून टाकू अशी धमकी राऊत देण्यात आली आहे.

महत्वाची बाब अशी की या तिन्ही प्रकरणावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे S फॅक्टर. आधी सिद्धू मूसेवाला, मग सलमान खान आणि आता संजय राऊत. हे नेमकं S फॅक्टर कनेक्शन काय आहे जे जाणून घेऊयात.

सलमान खानला धमकी- लॉरेन्श बिश्नोई गँगनं गेल्या वर्षी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एक पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानच्या घराबाहेर हे धमकीचं पत्र आढळून आलं होतं.

राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खाननं काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणी सलमानवर खटला देखील सुरू होता. राजस्थान कोर्टानं सलमानला निर्दोष मुक्तता देखील केली. पण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान आला.

लॉरेन्स बिश्नोई टोळी ज्या समाजाची आहे, तो बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो. हा समाज राजस्थानमधील जोधपूरजवळील पश्चिम थारच्या वाळवंटात राहतो. त्यांना निसर्गावर खूप प्रेम आहे. बिष्णोई समाजात प्राण्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते आणि त्यासाठी ते प्राणाची आहुती देऊ शकतात.

29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुमारे डझनभर हल्लेखोरांनी मुसेवालावर ३ डझन गोळ्या झाडल्या होत्या. घटनेपूर्वीच तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मुसेवालाला वर्चस्वाच्या लढाईत नव्हे तर बदलापोटी मारलं होतं.

मूसेवालाची हत्या केल्यानंतर लॉरेन्सनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हत्येनंतर मारेकरी नेपाळला गेले. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी लॉरेन्सची चौकशी केली आणि नेपाळला पळून गेलेल्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली होती. नुकतेच मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनाही धमकीचा मेसेज आला होता.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने पाठवलेल्या मेसेजमध्ये 'दिल्लीत सापडलास तर तुला AK47 ने उडवून टाकू', अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. तू आणि सलमान खान...शिक्कामोर्तब झालं आहे, असंही धमकीत नमूद आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या टोळीने राऊत यांना का धमकी का दिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.