Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:54 PM2021-07-09T14:54:08+5:302021-07-09T15:15:50+5:30

Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले.

हा फोन कॉल होता भजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांना वरिष्ठ केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह 12 मंत्र्यांना राजीनामा मागावा लागला.

नड्डा यांनी स्वतःच पार पाडली मंत्र्यांना राजीनामा मागण्याची जबाबदारी - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बुधवारी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल करण्याची तयारी करताच जेपी नड्डा यांनी आपला फोन हाती घेतला. पंतप्रधान मोदी आपल्या टीममध्ये काही नव्या चेहऱ्यांना घेणार होते, तर काही मंत्र्यांचे प्रमोशन होणार होते. मात्र, काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यासाठी काही जुन्या आणि वरिष्ठ मंत्र्यांचे राजीनामे घेणे आवश्यक होते...

...यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांचे राजीनामे घेणे आवश्यक होते. ही जबाबदारी स्वतः भाजप अध्यक्षांनी घेतली. त्यांना मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी केवळ एक फोन कॉल करण्याचीच आवश्यकता होती.

सर्वात पहिला फोन कोणत्या मंत्र्याला गेला? मंत्रिमंडळ विस्तारासाठी सायंकाळी 6 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती आणि त्यापूर्वी, ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून सुट्टी द्यायची त्यांचा राजीनामा आवश्यक होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी नड्डा यांनी सकाळपासूनच एक-एक करून या 12 मंत्र्यांना फोन करायला सुरुवात केली होती.

या 12 मंत्र्यांना फोन करून त्यांनी राजीनामा द्यायला सांगितले. या मंत्र्यांना लवकरात लवकर आपला राजीनामा राष्ट्रपती भवनात पाठवायला सांगण्यात आले होते. या मंत्र्यांपैकी सर्वात पहिला फोन गेला तो जलसंपदा राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांना. यानंतर एक-एक करून ससर्वांना फोन करण्यात आले. 

या मंत्र्यांचा घेण्यात आला राजीनामा - मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारमधील एक डझनहून अधिक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या 12 मंत्र्यांमध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, सदानंद गौडा, प्रताप सारंगी, देबाश्री चौधरी, संजय धोत्रे, बाबुल सुप्रीयो, थावरचंद गहलोत आणि जलशक्ति राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांचा समावेश होता.

या सर्व मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी शपथविधीपूर्वीच मंजूर केले. यापूर्वी मंगळवारी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले.

या मंत्र्यांकडून ज्या प्रकारे राजीनामे घेण्यात आले. त्यामुळे अनेक मंत्री नाराजही झाले. बाबुल सुप्रीयो यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या फेसबुकवर लिहिले आहे, की मी स्वतःसाठी दुःखी आहे. मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले, मी देऊन टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनाम्यासाठी कुठलेही कारण न सांगितल्याने सुप्रियो नाराज दिसून आले.

Read in English