अनोखा सोहळा! 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या 501 जोडप्यांचा सामूहिक विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:09 PM2023-05-16T19:09:28+5:302023-05-16T19:13:23+5:30

इतके जोडपे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये का राहत होते? जाणून घ्या...

झारखंडच्या खुंटी भागात आदिवासी लोकांची वस्तू सर्वाधिक आहे. यातील बहुतांश लोक गरीब आहेत. येथे केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्या पुढाकाराने रविवारी 501 जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मीरा मुंडाही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, लग्न झालेले सर्व जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

यावेळी 20 ते 70 वर्षे वयोगटातील जोडप्यांचा विवाह पार पडला. हा सामूहिक विवाह सोहळा करारा ब्लॉकमधील चोलवा पत्रा स्टेशन रोडचे आहे. येथे वृष्टी ग्रीन फार्मर्स शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरना धर्मातील 203 जोडपी, ख्रिश्चन धर्मातील 100 आणि हिंदू धर्मातील 198 जोडपी विवाहबंधनात अडकली.

वधू आणि वरांना आशीर्वाद दिले- वृष्टी ग्रीन फार्मर्स शेतकरी संघटनेच्या वतीने वधू-वरांचे त्यांच्या धर्मानुसार सामूहिक विवाह पार पडले. यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, त्यांच्या पत्नी मीरा मुंडा, तोरपाचे आमदार कोचे मुंडा आणि इतर मान्यवरांनी शुभाशीर्वाद देऊन सामूहिक विवाहाचा कार्यक्रम संपन्न केला.

गरीब कुटुंबातील जोडपे- आदिवासीबहुल भाग असल्याने येथे गरिबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याचा खर्च उचलण्यासाठी आदिवासींकडे पुरेसे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत या लोकांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परंपरा आणि प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे येथील जोडपे लग्नाशिवाय सोबत राहतात. अशा जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले.

नवविवाहित जोडप्यांना संबोधित करताना अर्जुन मुंडा म्हणाले की, नवविवाहित जोडप्यांना पती-पत्नी म्हणून सामूहिक विवाहात सामाजिक जीवन जगण्याचा अधिकार मिळेल. निबंधक कार्यालयात सर्व जोडप्यांची नोंदणी केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन अधिक मजबूत होईल.

गेल्या काही काळात जिल्ह्यात अशा प्रकारे सामूहिक विवाह लावून हजारो जोडप्यांना विवाहबंधनात बांधण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.