भारत जोडो न्याय यात्रा गुजरातला पोहचण्यापूर्वी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:04 PM2024-01-24T22:04:31+5:302024-01-24T22:12:20+5:30

गुजरातमध्ये १५ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकून काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचा दशकांचा जुना विक्रम मोडीत काढला होता. या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्या. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे दोन आमदार चिराग पटेल आणि सीजे चावडा यांनी विधानसभा सदस्यत्व सोडल्यानंतर या धक्क्यातून काँग्रेसही सावरू शकली नाही.

सध्या विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या केवळ १५ झाली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे आश्वासन पूर्ण करून भाजपा राज्यात निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीची घोषणा आणि उमेदवारांची निवड होण्यापूर्वीच पक्षाने निवडणूक कार्यालये उघडली आहेत. या सगळ्यामध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यात पोरबंदरचे आमदार अर्जुन मोढवाडिया यांच्या नावाचाही समावेश आहे, मात्र मोढवाडिया वारंवार ते भाजपात जाण्याच्या चर्चेचे खंडन करत आहेत. अयोध्येत राम मंदिराची उभारणी आणि तेथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनेतर भाजपा काँग्रेसच्या नाराज नेत्यांसाठी खास रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अन्य पक्षांतून पक्षात येणाऱ्या नेत्यांसाठी पक्षाने प्रदेश कार्यालयात व्यासपीठ उभारले आहे. या व्यासपीठावर दोनदा १०००-१००० नेते आणि कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे हाती घेतलेत. त्यात आता काँग्रेसमधील नेते भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात अर्जुन मोधवाडिया, बाबू बेजा, लालील वसोया, अमरीश डेर, भिखाभाई जोशी, विमल चुडासामा, बलदेवजी ठाकोर, रघु देसाई यांच्यासह अहमदाबाद शहर काँग्रेसचे प्रमुख हिम्मत सिंग पटेल यांच्या नावांचा समावेश आहे.

राहुल गांधींच्या दौऱ्याआधी भाजपाने राज्यात राजकीय भूकंप करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार भाजपाने विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात सामावून घेण्याची योजना आखली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व विद्यमान आणि माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेतील.

अर्जुन मोधवाडिया यांच्यासह जवळपास निम्मा काँग्रेस पक्ष भाजपामध्ये प्रवेश करणार आहे असा दावा केला जात आहे. अर्जुन मोढवाडिया हे तेच नेते आहेत ज्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला विरोध केला होता आणि काँग्रेसने अशा राजकीय निर्णयांपासून दूर राहायला हवे होते, असे म्हटले होते

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली भारत जोडो यात्रा गुजरातमधून गेली नाही. तेव्हा यात्रा महाराष्ट्रमार्गे पुढे गेली. राहुल गांधी त्यांच्या दुसऱ्या दौऱ्यात गुजरातमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे भाजपा त्यांच्या दौऱ्यापूर्वी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, भाजपाविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक राज्यात एकट्याने लढणार असल्याचे ममता यांनी जाहीर केले आहे. आपण दिलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचे ममता यांनी म्हटले आहे.

विरोधकांची मोट बांधून मोदींना टक्कर देण्याची योजना नीतीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी आखली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमारांचेच तळ्यात मळ्यात सुरु झाले आहे. त्यात आता ममता बॅनर्जी यांनी हात सोडल्याने काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांवर आलेली असली तरी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने आता प्रादेशिक पक्षांनी आपापली वेगळी वाट धरण्याचा विचार सुरु केला आहे त्यात काँग्रेस एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.