देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:13 PM2022-07-07T13:13:58+5:302022-07-07T13:17:47+5:30

राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ५० आमदारांनी केलेले बंड ऐतिहासिक ठरले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत ५० आमदारांनी भाजपासोबत एकत्र येत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार त्यांच्या गटात सामील करून घेतले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कलाकारीतूनच राज्यात सत्तांतर घडले अशी कबुलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदावर का आले? याची चर्चा सातत्याने सुरू आहे.

राज्यातील या राजकीय हालचालींचे सूत्र दिल्लीतून फिरवले गेले. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत विविध तर्क लढवले जात आहेत. ३० जून रोजी संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्वीट करून ‘फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील,’ असे जाहीर केले. तो सर्वांनाच धक्का होता.

दिल्लीत नेमकं काय घडलं? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली. भलेभले राजकीय पंडित यामागचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचे उत्तर अद्यापतरी कुणाला सापडले नाही. पक्षाचे आदेश मानत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं असं ते सांगत आहेत.

मात्र पत्रकार परिषदेत मी सरकार बाहेर राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत करणार असं जाहीरपणे घोषित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांबाबत ३ तासांत दिल्लीत वेगाने चक्रे फिरली. अमित शाह यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करत महाराष्ट्रातील सत्तांतरावर लक्ष केंद्रीत केले.

अशावेळी खुद्द एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेतृत्वाला दिल्लीत फोन करून फडणवीस यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी विनंती केली. फडणवीस सरकारबाहेर राहिले तर या सगळ्या प्रकरणामागचे भाजपचे दुहेरी उद्दिष्ट साध्य होणार नाही आणि आपले सरकारही कायम अस्थिर राहील, अशी भीती व्यक्त करणारा युक्तिवाद केल्याची कहाणी सांगितली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, डी. एल. संतोष आणि अमित शाह यांच्यात बोलण्यांना वेग आला. भाजपचे सरचिटणीस सी. टी. रवी मुंबईमध्ये कठीण प्रसंगाला सामोरे जात होते. नेमक्या याच क्षणाला भाजपाने आपले अख्खे स्क्रिप्ट ऐनवेळी बदलले असे मानले जात आहे.