विजयानंतर लगेचच उपसरपंचपदाचा राजीनामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:28 PM2018-08-31T16:28:44+5:302018-08-31T16:28:58+5:30
ऐकावे ते नवलच : विरोधकांना ताकद दाखविण्यासाठी लढवली निवडणूक
माळवाडी : गावगाड्यातील राजकारणात काय किस्से ऐकायला मिळतील याचा नेम नाही. केवळ विरोधकांना आपली ताकद दाखविण्यासाठी निवडणूक लढवून नंतर राजीनामा देण्याचा प्रकार देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये घडला. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण बच्छाव यांनी एका मताने विजय मिळविला आणि काही तासांतच पदाचा राजीनामाही दिला. केवळ विरोधकांना आपली ताकद दाखविण्यासाठीच्आपण निवडणूक लढविली आणि विजय संपादन केला. पदाचा मोह नसल्याने आपण राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकृतीसाठी व त्याच बरोबर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी ग्रामपंचायत सभागृहात बैठक बोलविली होती. यावेळी सरपंच उषा शेवाळे यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना देऊन सदर इच्छुक सदस्यांना अर्ज करण्यास सूचित केले. त्याप्रमाणे उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने रीतसर मतदान घेऊन परदेशी यांनी एका मताने लक्ष्मण बच्छाव यांना विजयी घोषित केले. बच्छाव यांनी नानाजी माळी यांचा एक मताने पराभव केला. पण बच्छाव यांनी विजय झाल्यानंतर काही तासांतच आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. अद्याप निवडणूक अधिकारी व सरपंच यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, परंतु लक्ष्मण बच्छाव मात्र आपला राजीनामा मंजूर करण्यासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकारी व सरपंच काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी सरपंच उषा शेवाळेसह ९ सदस्य व समर्थक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कोट.................
मी उपसरपंच पदाची निवडणूक लढवून विजय मिळवणे हे फक्त विरोधकांना दाखवण्यासाठीचा हा यशस्वी प्रयत्न होता. मला पदाची कुठलाही लोभ नसून आता पुढे आम्ही आमचे सदस्य शकुंतला शेवाळे यांना उपसरपंच करू.
- लक्ष्मण बच्छाव