अध्यक्षांसाठी ‘वेट अॅन्ड वॉच
By admin | Published: August 22, 2014 01:32 AM2014-08-22T01:32:05+5:302014-08-22T01:32:05+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी
पडद्याआड हालचाली : राष्ट्रवादीकडून जुन्या समीकरणाची चाचपणी?
नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
सर्वच पक्षात या पदासाठी इच्छुकांची भरमार असली तरी, जि.प.तील संख्याबळ विचारात घेता स्वबळावर कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष शक्य नाही. सर्वाधिक २२ सदस्यसंख्या असलेल्या भाजप व १९ सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. २० सप्टेंबरला निवडणूक असल्याने भाजप-शिवसेनेच्या बहुसंख्य सदस्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पडत आहे. वेळप्रसंगी बंडाची तयारी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तूर्त कुणाच्याही नावाची शिफास न करता विधानसभा निवडणुकीत मदत होईल. अशाच सदस्यांची शिफारस भााजप आमदार करणार आहेत.
भाजपच्या शुभांगी गायधने, कल्पना चहांदे, निशा सावरकर, शकुंतला हटवार व अरुणा मानकर आदी अध्यपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेच्या भारती गोडबोले व वर्षा धोपटे यांचीही नावेही चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या वादातून निशा सावरकर व भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती.
काँग्रेसचे संख्याबळ १९ आहे. बहुमतासाठी त्यांना ११ सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीचे सात, बसपा, आरपीआय व शिवसेना बंडखोर असे तीन सदस्य काँगे्रेससोबत येण्याची शक्यता गृहित धरली तरी आघाडीचे संख्याबळ २९ पर्र्यंतच जाते. त्यामुळे गोगपा वा शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला हाताशी धरून जि.प.ची सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु राष्ट्रवादीने अद्याप पत्ते ओपन केलेले नाही.
दुसरीकडे युतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची सदस्य संख्या आठ असूनही या पक्षाच्या वाट्याला उपेक्षाच आली. राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व शिक्षण सभापती अशी महत्त्वाची पदे तर शिवसेनेच्या वाट्याला महिला बालकल्याण व कृषी अशी खाती देण्यात आली. जि.प.च्या ५९ सदस्यांत भाजप- शिवसेनेचे ३० संख्याबळ आहे. पण सेनेच्या पुष्पा देशभ्रतार काँग्रेससोबत असल्याने युतीची सत्ता अडचणीत आली आहे. याही परिस्थितीत गोगपासोबत राहिल्यास सत्ता समीकरण जुळते. परंतु शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला अध्यक्षपद द्यावे लागेल. अशावेळी भाजप सदस्य बंडखोरी करण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी दगाफटका होण्याची शक्यता असल्याने सत्ता टिकविण्यासाठी युतीच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय पर्याय नसल्याने सध्याचेच समीकरण कायम ठेवण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. (प्रतिनिधी)