उगमापासून ते समुद्रानजीकाच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत गोदावरीला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:17 AM2018-11-18T09:17:00+5:302018-11-18T09:20:02+5:30

‘आपल्या नद्या, आपले पाणी’ : साक्षात दक्षिण-गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला तिच्या उगमापासून समुद्रानजीकच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत अखेरची घरघर लागली आहे की काय, अशी शंका येण्याजोगी स्थिती आज आहे. 

Godavari on last breathe from beginning to the Triangle region of the ocean | उगमापासून ते समुद्रानजीकाच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत गोदावरीला घरघर

उगमापासून ते समुद्रानजीकाच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत गोदावरीला घरघर

googlenewsNext

- विजय दिवाण 

गोदावरी जिथे उगम पावते त्या त्रिंबकेश्वरच्या खाली नाशिक हे एक तीर्थक्षेत्र आहे. नाशिकमधील पंचवटी या ठिकाणास धार्मिक महत्त्व आहे. तिथे गोदावरीला कॅ नॉलचे रूप दिले गेलेले आहे. दररोज भाविकांची अमाप गर्दी तिथे असते. गावोगावचे लोक तिथे अस्थी विसर्जन करण्यास येतात. फळे, फुले, निर्माल्य, खाद्यपदार्थ, वगैरे गोष्टी नदीत टाकल्या जातात. हजारो लोक तिथे आंघोळ करतात. नाशिकमध्ये जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा तर देशभरातून लाखो भाविक येथे जमतात. त्यांचे सर्व विधी गोदावरीच्या पाण्यातच होतात, तेव्हा तर नदीच्या प्रदूषणाला सीमाच नसते.

नाशिक आणि त्याच्या आसपासच्या शहरांचे सांडपाणी, तिथल्या ऊस-बागायती आणि द्राक्ष-बागायतींमधून निघणारे खतयुक्त पाणी यामुळे तिथे गोदावरी फार प्रदूषित झालेली आहे. दिल्लीच्या ‘साऊथ एशिया नेटवर्क  फॉर डॅम्स, रिव्हर्स, अँड पीपल’ या संस्थेच्या परिणीता दांडेकर यांनी त्याबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. प्रदूषणाखेरीज गोदावरीची एकूण जल-उपलब्धताही आता धोक्यात आलेली आहे. इतर कोणत्याही नदीप्रमाणे गोदावरीलाही पर्वतीय जलस्रोतांशिवाय तिच्या विविध उपनद्या आणि तिच्या पात्राखालचे भूमिगत जलसाठे या स्रोतांतून प्रवाही पाणी मिळत असते; पण २००३ साली नाशिकमध्ये कुंभमेळा झाला तेव्हा नाशिक महानगरपालिकेने पंचवटीतील रामकुंडाच्या तळाशी आणि जवळपासच्या इतरही काही कुंडांच्या तळाशी भरभक्कम काँक्रीट ओतून त्या साऱ्या कुंडांच्या तळांची उंची बरीच वाढवली.

कुंभमेळ्यासाठी नाशकात येणाऱ्या देशोदेशीच्या साधूसंतांना पुण्यस्नानासाठी कमरेपेक्षा जास्त उंच पाण्यात उतरावे लागू नये हा हेतू त्यापाठी होता; पण या अभेद्य काँक्रिटीकरणामुळे या कुंडांत सतत पाझरत राहणारे भूजलाचे झरे कायमचे बंद झाले. त्याकाळी एकतर सलग चार वर्षे पाऊस फार कमी झाला होता आणि त्यात भरीस भर म्हणून कुंडांचे भूमिगत झरेही कायमचे बुजवले गेले. त्यामुळे त्यानंतर रामकुंडात पाणी फारच कमी राहू लागले. आता त्या कोरड्या झालेल्या रामकुंडात देशोदेशीचे भाविक स्नान करणार कसे आणि पुण्य कमावणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून सन २०१५-१६च्या कुंभमेळ्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी आसपासच्या अनेक विहिरींचे पाणी टँकरमध्ये भरून आणले आणि त्या पाण्याने नदीपात्रातली कुंडे भरली! मग कुंभमेळ्यास आलेल्या हजारो साधूंनी त्या ‘पवित्र’ गंगेत बुड्या मारून पुण्य कमावले. २०१६ सालच्या उन्हाळ्यातदेखील एप्रिल महिन्यापासूनच नाशिकचे रामकुंड आणि त्यालगतची इतर कुंडे कोरडी पडली होती; पण तेव्हाही टँकर मागून टँकरने विहिरीचे पाणी आणून गोदावरीत टाकून भाविकांची पुण्य कमावण्याची सोय केली गेली.

नाशिकच्या पूर्वेस गोदावरी नदी कोपरगाव तालुक्यातून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण ही संत एकनाथांची कर्मभूमी आहे, म्हणूनच ते एक मोठे तीर्थक्षेत्रही आहे. तिथेही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे भाविक नाथ महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. तेही आपापले सारे विधी नदीपात्रातच उरकत असतात. पैठण शहराजवळ गोदावरी नदीवर असणाऱ्या जायकवाडी धरणामुळे ३४ हजार हेक्टर्स क्षेत्रफळाचा एक मोठा नाथसागर जलाशय निर्माण झालेला आहे. या जलाशयाच्या चोहोबाजूंनी अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातली अनेक लहान-मोठी शहरे, दोनशेच्या वर मध्यम गावे, कैक साखर कारखाने आणि औद्योगिक वसाहती आहेत. या साऱ्या शहरांचे आणि कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नित्यनियमाने जायकवाडी जलाशयात सोडले जाते. त्यामुळे नाथसागर जलाशय आणि जायकवाडी धरणाच्या खालच्या भागांतून वाहणारी गोदावरी नदी, या दोहोंच्या पाण्याचे जास्तच प्रदूषण होते.

Web Title: Godavari on last breathe from beginning to the Triangle region of the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.